Aurangabad | संभाजीनगरची घोषणा झाली तेव्हा खा. जलील केवढे होते? चंद्रकांत खैरेंनी हातवारे करून दाखवलं… पहा VIDEO!
औरंगाबादचे आजी-माजी खासदार अर्थात इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील आरोप प्रत्यारोप चांगलेच रंगत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी या राजकीय वक्तव्यांना आणखीच रंगत आलीय. खैरे यांनी खा. जलील यांच्या वयाविषयी केलेलं एक वक्तव्य सध्या चांगलंच गाजतंय...

औरंगाबादः चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) औरंगाबादचं नाव संभाजीनगर करणार असल्याचं मी लहानपणापासून ऐकतोय आणि खैरे हे लहान असल्यापासूनच असं बोलतात, असा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MIM MP Imtiaz Jaleel) यांनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत खैरे यांनीही सडेतोड उत्तर दिलंय. ते म्हणाले, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी संभीजानगरच्या नावाची घोषणा केली तेव्हा मी नगरसेवक होतो. 8 मे 1988 ला मी 36 वर्षांचा होतो. साहेबांनी त्यावेळी शहराच्या नावात औरंगजेब कशाला पाहिजे, असं म्हणत नामांतराची घोषणा केली होती. त्यावेळी इम्तियाज जलील होते… हे सांगता खैरे यांनी हातवारे करून दाखवले.. तसेच खा. जलील त्यावेळी राजकारणातदेखील नव्हते, असे स्पष्ट केले.
खैरेंचं तोडीस तोड उत्तर
1988 मध्ये संभाजीनगर नावाची घोषणा झाली त्यावेळी इम्तियाज जलील पत्रकार होते. त्यांनी माझ्यावरील अनेक एपिसोड तयार केले होते. आता राजकारणात आल्यापासून ते आरोप करत आहेत, त्यांना असं बोलण्याची सवयच आहे, असं स्पष्टीकरण चंद्रकांत खैरे यांनी दिलं.
संभाजीनगर नावाचं काय?
औरंगाबादचं संभाजीनगर नाव बदल करण्याची हिंमत शिवसेनेत नाही, असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला होता नाही,. त्याला उत्तर देताना चंद्रकांत खैरे म्हणाले, नाव बदल करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांचे आहेत. मात्र त्यांनी मुंबईतल्या सभेत सांगितलं त्याप्रमाणे आम्ही सांगितलं म्हणजे औरंगाबादचं नामांतर झालेलं आहे.
आमदारांना डांबून ठेवलंय?
राज्यसभेच्या निवडणुकीकरिता महाविकास आघाडीनं आमदारांना रिसॉर्टवर डांबून ठेवलंय, असा आरोप केला जातोय, यावर बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले, कोणत्याही निवडणुकीत हे राजकारण होतच असते. त्याचाच हा भाग आहे. महापालिका, नगरपरिषद निवडणुकीत असेच आमदारांना कुठेतरी नेले जाते. त्यामुळे यात काही गैर नाही. सर्वच पक्ष असं करतात, असा दावा खैरे यांनी कली.
भाजप कार्यकर्त्यांना नोटिसा
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी इतर पक्षांच्या वतीनं रास्ता रोको, आंदोलनं होऊ नयेत, यासाठी पोलिसांच्या दृष्टीनंही खबरदारी घेतली जात आहे. पोलिसांनी आज तब्बल 25 ते 30 भाजप पदाधिकाऱ्यांना नोटिस पाठवली आहे. या नोटिसीवर भाजपने संताप व्यक्त केला आहे. नोटिसीत चुकीची भाषा वापरल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
