प्रयत्नांना यश!! औरंगाबादेत लसीकरणाचा विक्रम, महिनाभरात 55 वरून 78 % वर झेप, साम-दाम-दंड-भेदाची मोहीम यशस्वी!
देशातील इतर देशाच्या तुलनेत लसीकरणात पिछाडीवर राहिल्याचे लक्षात येताच औरंगाबादमध्ये मागील महिनाभरापासून मोठी मोहीम उघडण्यासाठी आली. नियमांचा दट्ट्या , जनजागृती, निर्बंध आदी सर्वच पातळ्यांवरून लसीकरणासाठी प्रयत्न करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणजे मराठवाड्यात औरंगाबादेत यशस्वी लसीकरण झाले.
औरंगाबादः कोरोना प्रतिबंधक लसीकरणात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात औरंगाबादचा राज्यात 26 वा क्रमांक होता. त्यामुळे मागील महिन्यात औरंगबाद जिल्हापरिषद आणि महानगरपालिकेने लसीकरण वाढवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. महिनाभराच्या प्रयत्नानंतर आता औरंगाबादचा क्रमांक 26 वरून 16 वर पोहोचला आहे. एवढंच नाही तर मराठवाड्यात सर्वाधिक लसीकरण करण्याचा मान औरंगाबादला मिळाला आहे. 1 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील 55 टक्के लोकांनीच लसीचा पहिला डोस घेतला होता. मात्र आता 6 डिसेंबर रोजी हे प्रमाण 78 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. म्हणजे 36 दिवसात 23 टक्के अशी लसीकरणात वाढ झाली आहे.
पंतप्रधानांच्या सूचनेनंतर लसीकरणाला वेग
देशातील जे जिल्हे लसीकरणात पिछाडीवर आहेत, त्यांची एक बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली होती. यात औरंगाबादचाही समावेश होता. औरंगाबादसारख्या पर्यटनाच्या बाबतीत महत्त्वाच्या जिल्ह्यात लसीकरणाबाबत एवढे दुर्लक्ष का होतेय, याचा आढावाही केंद्र व राज्य सरकारतर्फे घेण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जिल्हाधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मात्र जिल्हा आणि मनपा प्रशासन वेगाने कामाला लागले.
नियमांचा धाक अन् जनजागृतीमुळे टक्का वाढला
जिल्हाधिकाऱ्यांनी लस न घेणाऱ्यांना पेट्रोल, रेशन मिळणार नाही, प्रवासाचीही मुभा मिळणार नाही, असे निर्देश दिले. तसेच लस न घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार नाही, असे आदेश दिले. त्यामुळे लस न घेणाऱ्यांनी आरोग्य केंद्रांवर गर्दी करण्यास सुरुवात केली. एका महिन्यात शहरात तब्बल चार लाख लोकांना लसीचे डोस देण्यात आले, अशी माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली. दरम्यान, शहरात अजून सव्वा दोन लाख लोकांचे लसीकरण बाकी आहे. एकूणच जिल्हाधिकारी आणि मनपा प्रशासकांनी लसीकरण वाढवण्यासाठी साम-दाम-दंड-भेद या चारही पातळ्यांवर मोहीम राबवली. त्यामुळेच हे यश मिळाले.
इतर बातम्या-