Special Stories : मनोजजी, फाशीची वेळ आली तर… जरांगेंच्या आंदोलनात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; कोण आहेत आशिमा मित्तल?
जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनात प्रवेश केला आहे. 'फाशीची वेळ आली तरी तयार' असे सांगत त्यांनी चर्चेची सूत्रे हाती घेतली. आयआयटी टॉपर आणि यूपीएससीत १२ वी रँक मिळवलेल्या आशिमा मित्तल यांची ही कर्तव्यपरायणता आणि प्रशासकीय भूमिका सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी जालन्याच्या अंतरवली सराटीत आंदोलन सुरू केलं आहे. जरांगे यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. जरांगे यांनी आंदोलन मागे घ्यावं म्हणून सरकार जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. आधी मंत्र्यांना पाठवून जरांगेंना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण जरांगे आंदोलनावर ठाम राहिले. त्यामुळे आता या चर्चेत नव्या चेहऱ्याची एन्ट्री झाली आहे. जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल या जरांगे यांच्याशी चर्चा करत आहेत. पहिल्यांदाच जिल्हाधिकाऱ्यांचा जरांगेंशी संवाद होत असल्याने जरांगे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच या आंदोलनामुळे आशिमा मित्तलही चर्चेत आल्या आहेत. आशिमा मित्तल या नेमक्या कोण आहेत? याचाच घेतलेला हा आढवा.
चर्चेसाठी पहिल्यांदाच महिला
मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घ्यावं म्हणून स्वत: जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आंदोलनस्थळी आल्या आहेत. यावेळी त्यांनी जरांगे यांचं म्हणणं ऐकून घेतलं. मात्र, जरांगे यांनी हे तुमचं काम नाहीये. तुम्ही शिकून पुढे आलेले लोक आहात. सरकारमधील चौथी शिकलेले मंत्री उगाच तुम्हाला पुढे करत आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्नच तुमच्या स्तरावरचा नाहीये. हा राज्यस्तरावरचा प्रश्न आहे. तुमच्याकडून काहीच होणार नाही, असं मनोज जरांगे यांनी आशिमा मित्तल यांना सांगितलं. त्यावर, मनोजजी, नोकरी करत असताना फाशी घेण्याची वेळ आली तरी माझी तयारी आहे, असं आशिमा यांनी म्हटलं. आशिमा मित्तल अजून जरांगे यांच्याशी चर्चा करत आहेत. त्यामुळे काही तोडगा निघतो का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कोण आहेत आशिमा?
आशिमा मित्तल या मूळच्या राजस्थानच्या आहेत. राजस्थानातील जयपूरमधील आहे. तिसऱ्या प्रयत्नात त्या यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत. यूपीएससीच्या 2018च्या परीक्षेत त्यांनी 12 वी रँक मिळवली होती. आशिमा या मुंबई आयआयटीच्या टॉपर होत्या. त्यांना गोल्ड मेडल मिळालं होतं.
मुंबई आयआयटीमधून सिव्हिल इंजीनियरिंग केल्यानंतर त्यांनी एका मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करण्यास सुरुवात केली. पण नोकरीत त्यांचं मन रमलं नाही. आपण या नोकरीसाठी जन्माला आलो नाही, असं त्यांना नेहमी वाटायचं. पैसा मिळत होता. पण मनशांती मिळत नव्हती. त्यांना आयएएस होण्याची इच्छा प्रबळ झाली. त्यामुळे त्यांनी ही नोकरी सोडली. त्यांनी नंतर यूपीएससीची तयारी सुरू केली. आशिमा यांना नेहमी यश मिळालं होतं. त्यामुळे आताही यश मिळेल असं त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना वाटलं. पण त्यांना या परीक्षेत यश आलं नाही. त्यामुळे त्यांना नैराश्य आलं. त्यातून सावरण्यासाठी त्यांनी आपल्या आवडते छंद जोपासण्यास सुरुवात केली.
झोपडपट्टीतील तो मुलगा अन्…
आशिमा यांनी मानववंशास्त्रात शिक्षण घेतलं आहे. दिल्लीत मानववंशास्त्राची पदवी घेत असताना प्रोजेक्टसाठी त्या नेहमी झोपडपट्ट्यांमध्ये जात होत्या. या काळात त्यांना एका घरात एक महिला भेटली. तिचा मुलगा हलतडुलत नव्हता. मुलाची तब्येत कशी बिघडली हे या महिलेला माहीतही नव्हतं. आशिमा यांनी हे पाहिल्यावर त्या या मुलाला घेऊन रुग्णालयात गेल्या. त्यांनी या मुलावर उपचार करून घेतले. पण या घटनेने त्यांच्या मनावर मोठा परिणाम झाला. त्याचवेळी लोकांच्या मदतीला धावून जाता येईल, एवढं मोठं व्हायचं हे त्यांनी मनाने ठरवलं.
त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा यूपीएससीची तयारी सुरू केली. विशेष म्हणजे यूपीएससीत त्यांना दुसऱ्यांदा म्हणजे 2016मध्ये यश मिळालं. त्यांना 328 वी रँक मिळाली आणि आयआरएस (आयटी) सेवा मिळाली. पण आशिमा यांना ते बिलकूल पसंद नव्हते. तरीही त्यांनी आयआरएस सेवा ज्वॉईन केली. पण पुन्हा यूपीएससीची तयारी सुरू ठेवली. त्यांनी तिसऱ्यांदा प्रयत्न केला. तीन वेळा प्री, तीन मेन्स आणि तीन मुलाखती दिल्यानंतर आशिमा यांना घवघवीत यश मिळालं. त्या यूपीएससीत 12 नव्या आल्या. त्यानंतर त्या 2018मध्ये नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रूजू झाल्या.