
28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून बारामतीच्या दिशेने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार निघाले होते. मात्र, बारामती विमानतळाच्या अगदी शेजारी त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकही व्यक्ती वाचू शकली नाही, विमानातील सर्वांचा मृत्यू झाला. अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले, यावर कोणालाही विश्वास बसत नव्हता. अजित पवार यांच्या निधनाच्या चार दिवसांनंतर सुनेत्रा पवार या मुंबईकडे रवाना झाल्या आणि त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यासोबतच पक्षाची धुराही त्यांनी आपल्याच हातात ठेवली. यादरम्यानच आमदार रोहित पवार यांच्याकडून अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक संशय व्यक्त केली जात आहेत. हा अपघात की घातपात असाही सवाल त्यांनी केला. अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यू प्रकरणाला नवीन वळण लागले आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न रोहित पवार यांच्याकडून केला जात आहे. आता रोहित पवार यांच्या तक्रारीवरून बंगळूर पोलिसांनी मोठ्या गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी झिरो एफआयआर दाखल करून तो पुढील तपासासाठी महाराष्ट्र पोलिसांकडे सोपवला आहे.
याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटना इतरत्र कुठेही घडली असली तरी हा एफआयआर कोणत्याही पोलीस ठाण्यात दाखल केला जाऊ शकतो. राज्यातील पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यास नकार दिला किंवा ते शक्य नसल्याचे सांगितल्यानंतर आता रोहित पवार यांनी थेट बंगळूर मध्ये एफआयआर नोंदवली.
रोहित पवार यांनी आपल्या तक्रारीत दावा केला की, हा फक्त अपघात नसून काकांना (अजित पवार) संपवण्याचा हा एक हेतुपुरस्सर रचलेला कट असू शकतो. विमान संचालनातील गंभीर निष्काळजीपणा, सुरक्षा मानकांचे उल्लंघन आणि नोंदींमधील फेरफार यांमुळे हा अपघात घडला असाही आरोप त्यांनी केला. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर काही गंभीर आरोप केले जात आहेत. रोहित पवार यांनी विमान कंपनीवर आरोप केले, त्यांनी दिल्लीतील अनेक नेत्यांची भेटही घेतली.