Baramati ByElection : सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देणार का? माघारीवर वेट अँड वॉच; हर्षवर्धन सपकाळ यांच्या संकेताचा अर्थ काय?

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीला अनपेक्षित वळण मिळाले आहे. सुनेत्रा पवारांची उमेदवारी बिनविरोध अपेक्षित असताना, काँग्रेसने आकाश मोरे यांना उभे करून नवा पेच निर्माण केला. उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू असताना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाची 'वेट अँड वॉच' भूमिका स्पष्ट केली. यामुळे आता काँग्रेसच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Baramati ByElection : सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देणार का? माघारीवर वेट अँड वॉच; हर्षवर्धन सपकाळ यांच्या संकेताचा अर्थ काय?
हर्षवर्धन सपकाळ
| Updated on: Apr 09, 2026 | 11:46 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभा संघाची जागा रिक्त झाली असून तेथे पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. महायुतीतर्फे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. आत्तापर्यंत ही निवडणूक बिनविरोध होईलं असं मानलं जात होतं, मात्र काँग्रेसने अचानक एंट्री करत आकाश मोरे यांना निवडणुकीसाठी उभं केल्याने निवडणुकीला अनपेक्षित वळ मिळालं, नवा पेच निर्माण झाला.

बारामती पोटनिवडणूकीतून आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून त्यामुळेच घडामोडींना वेग आला आहे.  काँग्रेसने उमेदवारी मागे घ्यावी यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेत मागणी केली होती. तसेच सुनेत्रा पवार यांनीही सपकाळ यांना फोन करत उमेदवारी मागे घेण्याबाबात निवडणूक बिनविरोध होऊ देण्याबाबत चर्चा केल्याचे समजते.

या सर्व पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी थोड्या वेळापूर्वीच माध्यमांशी संवाद साधत या प्रकरणावर पक्षाची भूमिका स्पष्टपणे मांडली.

हर्षवर्धन सपकाळांचं म्हणणं काय ?

बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय असेल तो तुम्ही स्वत: घेणार आहात की काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून तो होईल ? असा सवाल सपकाळ यांना विचारण्यात आला. ‘ या (निवडणूक लढवणं, ) संदर्भात आम्ही भूमिका घेऊन पुढे गेलो, आमची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आणि आम्ही उमेदवारी अर्ज दाखाल केलाला आहे. या संदर्भात ( निवडणुकीतून उमेदवारी मागे घेणं) ज्या विनंती येत आहे, सहानुभुतीच्या अनुषंगाने जे बोललं जात आहे, त्यासंदर्भात मी महाराराष्ट्रातील आमच्या सर्व आदरणीय नेत्यांसोबत संपर्कात आहे, त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. त्यांच्याशी संपूर्ण चर्चा केल्यानंतर पुढची भूमिका हा काँग्रेस पक्ष ठरवेल’ असं सपकाळ म्हणाले. आमच्या नेत्यांशी, आमदारांशी संपर्क साधून नंतर निर्णय घेऊ असं ते म्हणाले. यामुळे काँग्रेसची वेट अँड वॉच भूमिका कायम असून तो पक्ष या निवडणुकीसंदर्भात काय निर्णय घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पार्थ पवारांना पश्चाताप होईल

काँग्रेसने बारामती निवडणुकीसाठी उमेदवार उभा केल्यावर पार्थ पवार यांनी नाराजी व्यक्त करत, काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाला अशी टीका केली होती. त्यांच्या या विधानानंतर ट्विट करत काँग्रेसनेही सडेतोड प्रत्युत्तर दिलं होतं.  काँग्रेसची याबाबत आत्ताची भूमिका काय असा सवाल आज हर्षवर्धन सपकाळ यांनाही विचारण्यात आला.   ‘ मुळात त्यांचं वक्तव्य हे ध्यानात घेण्यासारखं नाही, ते वक्तव्य निराधार आहे. ते प्रगल्भतेच्या मापदंडात गेलेलंं असल्यामुळे त्यांना आज, उद्या, कधीतरी पश्चातप झाल्याशिवाय राहणार नाही’ असं सपकाळ म्हणाले.

पार्थ पवार हे अजित दादांचे पुत्र आहेत, त्यांची लिगसी त्यांच्याजवळ आहे. या अनुषंगाने त्यांनी निर्वाह करत असताना, सर्व गोष्टींची जाण आणि भान ठेवलं पाहिजे. ते कोणाचं ऐकतात, काय ऐकतात, कशामुळे झालं हे तपासणं काँग्रेस पक्षाचं काम नाही. आमच्या पक्षाशी त्याचा दुरान्वयेही संबंध नसल्यामुळे ते का बोलले याबद्दल मला माहिती नाही. मात्र ते भाजपसोबत राहून राहून आता वेगळंच, निराधार, कुठल्याही प्रकारचं संदर्भ नसलेलं वक्तव्य करण्याच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली.

 

Follow Us