
Manoj Jarange Big Statments: महापालिका निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीचा पुरता धुव्वा उडवल्याचे दिसते. काँग्रेस अनेक ठिकाणी या झंझावात पुरुन उरल्याचे दिसले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा पराभव मोठ्या आत्मचिंतनाचा आहे. दरम्यान बीड येथे माध्यमांशी बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी महापालिका निवडणूक निकालावर मोठे भाष्य केले. भाजपवर बोलताना त्यांनी इतर पक्षांना मोठा इशारा दिला. त्यांनी अजितदादांवर जळजळीत प्रतिक्रिया दिली. त्याचवेळी त्यांनी या पक्षांची धाकधूकही वाढवली.
भाजपवाले मोठे कलाकार…
यावेळी मनोज जरांगे यांना या निकालाकडे तुम्ही कसं बघता असं विचारले असता त्यांनी इतर सर्वच पक्षांना चिमटे काढत मोठा इशाराही दिला. या निकालाकडे कशाला आणि काय बघायचं. भाजपनं बघायला काही ठेवलंच नाही. अगोदर भाजपने महाविकास आघाडी संपवली. भाजपवाले मोठे कलाकार आहेत. आधी भाजपने महाविकास आघाडीचा काटा काढला. आता शिंदेसेना आणि अजितदादांचा कार्यक्रम लावला असा सणसणीत टोला जरांगे पाटील यांनी लगावला. त्यांनी या दोन्ही पक्षांना मोठा इशारा दिल्याचे मानले जात आहे.
अजितदादांपासून मराठे दूर
तर यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. मराठे हे अजितदादांपासून दूर जात आहेत. त्याचा झटका त्यांना कळाला असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला. पापी लोकं आणि रक्तानं माखलेले लोक तुम्ही सोबत ठेवले तर असले परिणाम भोगावे लागतात असे वक्तव्य त्यांनी राष्ट्रवादीच्या पराभवाविषयी केले. दोन-तीन नासके लोक सोबत ठेवल्याने हा पराभव झाल्याचे ते म्हणाले. भाजप असे लोक का जवळ ठेवत नाही? अजितदादांनी यातून तरी समज घ्यावी असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांना मराठ्यांचं मतदान पडलं नसल्याचा दावा जरांगे यांनी केला.मी राजकारण करत नाही. पण या निकालातून हे स्पष्ट होते असे जरांगे पाटील म्हणाले.
मुस्लिम-अनुसूचित जाती-मराठ्यांनी…
एमआयएमच्या जागा निवडून आल्याबाबत त्यांनी मोठं वक्तव्य केलं. मुस्लिम, अनुसूचित जाती आणि मराठ्यांनी राजकारणात येऊ नाही का? असा सवाल त्यांनी केला. मुस्लिम-दलित आणि मराठे एकत्र झाले तर धुराळाच होतो. त्यामुळेच मी या तीनही समाज घटकांना आवाहन करत असतो की, एकदा यांना पायाखाली चेंगरा, बहुतेक 2029 मध्ये ते यांचा सुपडा साफ करतील असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.