यंदा पाऊस कधी? कोणत्या पिकाला सोन्याचा भाव? कोणावर संकट? भेंडवळची भविष्यवाणी जाहीर

३७० वर्षांची परंपरा असलेल्या भेंडवळच्या घटमांडणीचे निष्कर्ष जाहीर झाले आहेत. यंदा पावसाची स्थिती कशी राहील, अतिवृष्टीचा धोका कधी आहे आणि कोणत्या पिकांना चांगला भाव मिळेल, याबद्दलची सविस्तर माहिती आणि शेतकऱ्यांसाठी धोक्याचा इशारा या बातमीत वाचा.

यंदा पाऊस कधी? कोणत्या पिकाला सोन्याचा भाव? कोणावर संकट? भेंडवळची भविष्यवाणी जाहीर
Bhendval Bhavishwani
| Updated on: Apr 20, 2026 | 7:29 AM

गेल्या ३७० वर्षांपासून शेतकरी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात, ती भेंडवळची घटमांडणी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडली. चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी आज सूर्योदयाच्या वेळी या मांडणीचे निष्कर्ष जाहीर केले. यंदा पाऊस पाणी कसा राहणार? पिकाला भाव मिळणार का? कोणत्या पिकावर रोगराई येणार? अतिवृष्टी होणार का? या सर्व प्रश्नांचे उत्तर देणारी भेंडवळची घटमांडणी आज जाहीर झाली. यंदाच्या भाकितानुसार पावसाची स्थिती संमिश्र राहणार असून, शेतकऱ्यांसाठी आनंदासोबतच चिंतेची बातमी समोर आली आहे.

पाऊस कधी बरसणार आणि कधी झोडपणार?

यंदाच्या भेंडवळाच्या घटमांडणीच्या भाकितानुसार पावसाची स्थिती चढ-उताराची राहणार आहे. पावसाचे चार महिने कसे असतील, याची माहितीही समोर आली आहे पावसाचा पहिला महिना अत्यंत कमी पावसाचा असेल. यामुळे सुरुवातीच्या पेरण्यांना विलंब होऊ शकतो किंवा दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. दुसऱ्या महिन्यात पाऊस साधारण स्वरूपाचा राहील, ज्यामुळे पिकांना उभारी मिळेल.

पण तिसरा महिला हा सर्वात घातक ठरु शकतो. या महिन्यात जलप्रलय होण्याची शक्यता आहे. या काळात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून नद्यांना महापूर येण्याचे संकेत आहेत. यामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. यानंतर चौथ्या महिन्यातही पावसाची उपस्थिती असेल, मात्र तो काढणीला आलेल्या पिकांसाठी अडथळा ठरू शकतो. यंदा अवकाळीचा मोठा तडाखा पाहायला मिळणार आहे. यंदा पावसाळ्याव्यतिरिक्त अवकाळी पाऊस भरपूर असेल, ज्यामुळे वर्षभर शेतीकामात व्यत्यय येईल.

कोणत्या पिकावर रोगराई येणार?

यंदा पिकांवर रोगराईचे प्रमाण जास्त राहणार असल्याचे भाकीत भेंडवळीच्या भाकितात वर्तवण्यात आले आहे. यंदा कापूस पीक साधारण येईल, मात्र त्याला बाजारभाव चांगला मिळेल. तिळाचे पीक यंदा उत्तम राहील. तूर पिकाची स्थिती अनिश्चित असेल. मूग साधारण येईल, पण भाव चांगले राहतील. उडीद आणि अंबाडीवर रोगराईचा मोठा प्रादुर्भाव दिसेल. बाजरीचे पीक चांगले येईल. ज्वारीचे पीक साधारण असले तरी त्याचे बाजारभाव वाढलेले राहतील. गहू, हरभरा, वाटाणा, मटकी आणि मसूर ही पिके सर्वसाधारण सरासरी राहतील.

दरम्याना एकूणच भेंडवळच्या भाकितानुसार यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी कसोटीचा ठरणार असल्याचे पाहायला मिळत आहे. अतिवृष्टी आणि रोगराई या दोन संकटांशी झुंज देत शेतकऱ्याला शेती करावी लागेल. या काळात चारा-पाण्याची टंचाई भासणार नाही. हाच मोठा दिलासा असेल, असे संकेत या मांडणीतून मिळताना दिसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us