तुम्ही जर एका बापाचे असाल तर आधी मला रोखा, तुम्ही म्हणाल तिथे… माजी सरन्यायाधीशाच्या भावानेच श्याम मानव यांना ललकारले
Bhushan Gavai : माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या बागेश्वर धाम भेटीनंतर एक नवा वाद उफाळून आला. श्याम मानव यांनी केलेल्या टीकेवर त्यांचे बंधू राजेंद्र गवई यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आणि एक खुले आव्हान दिले.

भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नुकतीच मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध बागेश्वर धामला कुटुंबासह भेट दिली होती. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी अमरावतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भूषण गवई यांच्यावर टीका केली आहे. भूषण गवई धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या पाया पडायला गेले होते याचा मला प्रचंड शॉक बसला आहे असं विधान केले होते.
काय म्हणाले होते श्याम मानव?
श्याम मानव यांनी म्हटले होते की, भूषण गवई हे रासू गवई यांचे सुपुत्र आहे, यापूर्वी विकृत बाबांचा सत्कार दीक्षाभूमीवर घेतला त्यावेळेस मी विरोध केला होता. भूषण गवई म्हणतात की मी स्वतः आंबेडकरी विचाराचा आहे. आंबेडकरी विचारांचे मी दूध पिलो आहे पण तो माणूस जर धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या पाया पडून आशीर्वाद घेत असेल तर आता तुम्ही यापुढे आंबेडकरांचे नाव कधीही घ्यायचं नाही तो अधिकार तुम्ही गमावलेला आहे. यावर आता भूषण गवई यांचे बंधू डॉ राजेंद्र गवई यांनी भाष्य केले आहे.
एका बापाचे असाल तर…
भूषण गवई यांचे बंधू डॉ राजेंद्र गवई यांनी श्याम मानव यांच्या विधानावर बोलताना म्हटले की, भूषण गवई बागेश्वर धामला गेल्याने टीका होत आहे परंतु प्रत्येक आंबेडकरी नेता कुठे ना कुठे गेलेला आहे. प्रत्येकच आंबेडकरी नेता हा गणपती मंदिर, हनुमान मंदिर, चर्च, मज्जिद मध्ये गेलेला आहे. समाजात राहत असताना मित्रांच्या आग्रहाखातर कधी कधी जावं लागतं पण मी त्याबद्दल बोलत नाही भूषणजी त्यावर बोलतील. मी श्याम मानव यांना आव्हान देतो की, भूषणजींना नंतर रोखा आधी हिंमत असेल तर मला रोखा. तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी एकटा निशस्त्र येईल. तुम्ही जर एका बापाचे असाल तर माझा आव्हान स्वीकारा.
फडणवीसांचेही श्याम मानव यांना उत्तर
भूषण गवई यांची बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यायचे नाही या श्याम मानव यांच्या विधानावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘श्याम मानव कोण आहेत हे सांगणारे? त्यांना कुणी हा अधिकार दिला? ते थोडीच सर्टिफिकेट वाटणार आहेत? श्याम मानव अलिकडच्या काळात फक्त प्रसिद्धीसाठी बोलतात. त्यांना कुणी विचारत नाहीत, त्यामुळे प्रसिद्धी मिळावी म्हणून ते रोज अशी विधानं करतात.’
