जायकवाडी धरणातून 50 हजार क्यूसेक पेक्षाही अधिकचा विसर्ग, गोदाकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा

| Updated on: Sep 18, 2020 | 11:18 AM

मुसळधार पावसानंतर जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे (Big water discharge from Jayakwadi Dam High Alert).

जायकवाडी धरणातून 50 हजार क्यूसेक पेक्षाही अधिकचा विसर्ग, गोदाकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा
Follow us on

औरंगाबाद : मुसळधार पावसानंतर जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे (Big water discharge from Jayakwadi Dam High Alert). त्याच पार्श्वभूमीवर गोदावरी नदी काठच्या गावांना अति सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. रात्रीतून 50 हजार क्यूसेक पेक्षाही जास्त क्षमतेने पाण्याचा विसर्ग होणार आहे. त्यामुळे गोदावरी नदीला तुफान पूर येण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नदी काठच्या नागरिकांना प्रचंड सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग झाल्यानंतर गोदावरी नदीला येणाऱ्या पुरामुळे औरंगाबादसह जालना, परभणी, नांदेड या जिल्ह्यामध्ये याचा परिणाम जाणवणार आहे. जायकवाडी धरणाचे अभियंता राजेंद्र काळे आणि बुधभूषण दाभाडे यांनी याबाबत माहिती दिली असून त्यांनी अति सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जालना जिल्हा नियंत्रण कक्ष, आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयाने नागरिकांना आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलं, “आज (17 सप्टेंबर) रात्री 10.30 वाजता प्राप्त माहितीनुसार जायकवाडी प्रकल्पामधून 47 हजार 160 क्यूसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रामध्ये प्रवाहित करण्यात येत आहे. तेव्हा नागरिकांनी त्यांची चल, अचल मालमत्ता गोदापात्रातुन काढून घ्यावी. कोणीही नदीपात्रात जाऊ नये. नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी सतर्कता बाळगावी. जेणेकरुन कोणतीही जीवित आणि वित्तहानी होणार नाही.”

दरम्यान, याआधी 14 सप्टेंबर रोजी मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असलेलं जायकवाडी धरण 98 टक्क्यांपेक्षा जास्त भरलं होतं. तेव्हापासूनच पैठण जलविद्युत केंद्रातून वीजनिर्मिती करुन एकूण 1589 क्यूसेकने पाणी सोडण्यात आलं होतं. शिवाय डाव्या कालव्यातूनही विसर्ग सुरु होता. त्यामुळे धरणाखालील भागातील नागरिकांनी सतर्क रहावं, नदीच्या पात्रात जाऊ नये, असं आवाहन पैठणचे तहसीलदार महेश सावंत यांनी केलं होतं.

60 किलोमीटरची लांबी आणि दहा किलोमीटरची रुंदी इतका मोठा पसारा असलेल्या या नाथसागराची आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख आहे. जायकवाडी धरणाची तब्बल 102 टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आहे. हे धरण एकदा पूर्ण भरलं तर दोन वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि 4 वर्षांच्या पिण्याची पाण्याची सोय होते. म्हणून या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र समजला जातो.

नाथसागरावर अवलंबून क्षेत्र

नाथसागरावर मराठवाड्यातील पाच जिल्हे अवलंबून असतात. औरंगाबाद, बीड, जालना, परभणी आणि नांदेड हे जिल्हे जायकवाडी धरणावर थेट अवलंबून आहेत. तर परळी इथलं वीजनिर्मिती करणारं थर्मल सुद्धा याच पाण्यावर अवलंबून असतं.

जायकवाडी धरणाला उजवा आणि डावा असे दोन कालवे आहेत. या कालव्यातून मराठवाड्यातल्या पाचही जिल्ह्यातील शेतीसाठी पाणी सोडलं जातं. यातल्या डाव्या कालव्याची लांबी ही तब्बल 208 किलोमीटर आहे.

जायकवाडी धरणातून तब्बल अडीच ते तीन लाख हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी पाणी सोडलं जातं. याच धरणावर औरंगाबाद आणि जालना या दोन महानगराच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. तब्बल 400 गावांची तहानही जायकवाडी धरण भागवतं.

औरंगाबादमधील वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, पैठण आणि जालना औद्योगिक वसाहती सुद्धा याच धरणावर अवलंबून आहेत. त्यामुळे जायकवाडी धरण भरणं म्हणजे मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणे असंही समजलं जातं.

संबंधित बातम्या :

जायकवाडी 98.23 टक्के भरलं, धरणाखालील भागात सतर्कतेचा इशारा

जायकवाडी धरण शंभरी जवळ पोहोचले, आज धरणाचे दरवाजे उघडणार

दुष्काळमुक्तीचा ‘पंकजा’ पॅटर्न, जायकवाडीतील पाण्याने बीड व्यापणार

संबंधित व्हिडीओ :

Big water discharge from Jayakwadi Dam High Alert