
राज्यातील नगर पंचायत आणि नगर पालिकांच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये इनकमिंग पहायला मिळत आहे. ही निवडणूक पार पडल्यानंतर लगेच महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या माजी नगरसेवक दाम्पत्याने भाजपची साथ सोडली आहे. यामागील कारण आता समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
काही दिवसांनंतर कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. सध्या बरेच नेते भाजपमध्ये प्रवेश तरत असताना या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला धक्का बसला आहे. माजी नगरसेवक श्रीकर चौधरी व त्यांची पत्नी माजी नगरसेविका प्रमिला चौधरी यांचा भाजपचा राजीनामा दिला आहे. यावेळी त्यांनी पक्षावर नाराजी देखील व्यक्त केली आहे.
भाजपचा राजीनामा देताना माजी नगरसेवक श्रीकर चौधरी यांनी म्हटले की, ‘भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेल्या लोकांनी बॅनरबाजी करत तिकीट मिळणार असल्याचे आश्वासन मिळाले आहे असं सांगितलं आहे. त्यामुळे आम्हाला दु:ख झालं आहे. कार्यकर्त्यांच्या भूमिकेचा विचार न करताच घेतले जाणारे निर्णय खटकले आहे. आता त्यांना आमची गरज नसेल तर आम्हालाही राजकारणाची गरज नाही.’
पुढे बोलताना श्रीकर चौधरी म्हणाले की, ‘1995 पासून पक्षात काम करत आहे. 2000 पासून मी दोन वेळा आणि माझी पत्नी दोनवेळा असं सलग चार वेळा निवडून आलो आहोत. आम्ही भरपूर जनतेची सेवा केली आहे. आता आम्ही दोघेही राजकारणातून संन्यास घेत आहोत. राजकारण वाईट झाले आहे, आपल्याच मर्जीने आलो, आपल्या मर्जीने बाहेर जात आहे. आम्ही माफिया नाही, शिक्षित आणि सरळ आहोत. तिकीट आश्वासनावरील अस्पष्टता आणि दुर्लक्ष यामुळे नाराज झालो आहोत. आता आम्ही कोणतीही निवडणूक लढवणार नाहीत.’
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी याबाबत बोलणं झालं का? यावर बोलताना श्रीकर चौधरी म्हणाले, ‘आमचं कुणाशीही बोलणं झालेलं नाही. आम्हाला तशी गरजही वाटली नाही. आम्ही आता राजकारणातून संन्यास घेत आहोत, त्यामुळे आम्ही आता कोणतीही निवडणूक लढवणार नाही.’