
गेल्या काही काही काळापासून राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी पहायला मिळत आहेत. अलिकडेच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पक्षांतर झालेले पहायला मिळाले होते. सुरुवातीला नगर पंचायत, नगरपालिका, त्यानंतर महानगर पालिका आणि त्यानंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अनेक नेत्यांनी आपापल्या सोयीनुसार सत्ताधारी किंवा विरोधी पक्षांमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता निवडणुका संपल्यानंतरही पक्षांतर होताना पहायला मिळत आहे. काँग्रेसच्या एका माजी आमदाराने असंख्य पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
चंद्रपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. चिमूर येथील काँग्रेसचे माजी आमदार अविनाश वारजूकर यांनी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे चंद्रपूरमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. अविनाश वारजूकर यांच्यासह माजी जि.प. अध्यक्ष तथा काँग्रेसचे प्रदेश महासचिव सतिश वारजूकर, युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव तथा शंकरपूर ग्रामपंचायतीचे सरपंच साईश वारजूकर यांचा समावेश आहे. या सर्वांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतले.
समोर आलेल्या माहितीनुसार, अविनाश वारजूरकर आणि त्यांचे बंधू सतीश वारजूरकर यांनी 25 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होते. याबाबतचे एक पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष यांच्याकडे पाठवले होते. या दोन्ही नेत्यांनी आपल्या राजीनामा पत्रात काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर अत्यंत तिखट शब्दांत ताशेरे ओढले होते. पक्षात अंतर्गत गटबाजी शिगेला पोहोचली असून, यामुळे सामान्य कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच काँग्रेस पक्षाचा वापर काही लोकांकडून स्वतःच्या धंद्यासाठी केला जात आहे, वारंवार तक्रारी करूनही पक्षश्रेष्ठींकडून या बाबींकडे दुर्लक्ष केले जात आहे. या मुळे आम्ही राजीनामा देत आहोत असं या दोघांनी म्हटले होते.
भाजपा परिवाराच्या कार्यशैलीने प्रेरित होऊन चिमूर (जि.चंद्रपूर) येथील कॉंग्रेसचे माजी आमदार अविनाश वारजुकर यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भाजपाचे कमळ हाती घेतले.
पक्षप्रवेश करणाऱ्या मान्यवरांमध्ये माजी जि.प. अध्यक्ष तथा काँग्रेसचे प्रदेश महासचिव सतिश वारजुकर, युवक काँग्रेसचे… pic.twitter.com/MiJbQfPGpI
— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) February 26, 2026
काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्यापूर्वी वारजूरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर आता त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला खा. धैर्यशील पाटील, चिटणीस आ. प्रशांत ठाकूर, सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, सरचिटणीस ॲड. माधवीताई नाईक, सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवि अनासपुरे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.