
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, निवडणूक आयोगाकडून मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत, मात्र अद्याप महापालिकेच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली नाहीये. नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
दरम्यान निवडणूक आयोगानं निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करताच आता सर्व पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं पहायला मिळत आहे. मात्र या निवडणुका महायुती आणि महविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार की स्वबळावर याबाबत अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाही. विरोधक आणि सत्ताधारी दोन्ही बाजुंच्या अनेक नेत्यांनी ही निवडणूक स्वबळावर लढवण्याची इच्छा बोलून दाखवल्यानं निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
त्यातच आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला विभागाची दोन दिवसीय महत्त्वाची बैठक वाय बी चव्हाण सेंटर येथे सुरू आहे, या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आणि पालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवर युती करताना केवळ भाजप सोबत युती करायची नाही, असा निर्णय बैठकीत झाल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक परिस्थिती पाहून युती आघाडी बाबत निर्णय घ्या, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना पक्षातील नेतृत्वाकडून देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. बैठकीच्या पहिल्याच दिवशी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान जर भाजप सोडून इतर सर्व पक्षांसोबत युती करण्याची राष्ट्रवादी शरद पवार गटाची तयारी असेल तर मग राष्ट्रवादी शरद पवार गट आता राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत देखील युती करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे महायुतीची देखील जोरदार तयारी सुरू असल्याचं पहायला मिळत आहे.