कल्याण-डोंबिवलीकर वाऱ्यावर, KDMC ची परिवहन सेवा पूर्णपणे ठप्प, कामबंदचा फटका
कंत्राटदाराने पगार कपात केल्याच्या निषेधार्त कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारल्याने केडीएमसीच्या बस डेपोतून एकही बस रस्त्यावर न आल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. प्रवाशांना रिक्षा-टॅक्सी ओला-उबरचा आसरा घ्यावा लागल्याने कल्याण-डोंबिवलीकरांना नाहक फटका बसला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेची परिवहन सेवेचे ब्रीदवाक्य जरी ‘सेवेशी तत्पर’ असे असले तरी आज ही सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. कंत्राटदाराकडून कोणतीही पूर्वकल्पना न देता कंत्राटी चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांच्या पगारातून रक्कम कपात करण्यात आल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे KDMT डेपोतून एकही बस रस्त्यावर उतरली नसून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. दरम्यान, मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करत प्रशासनाला आक्रमक इशारा दिला आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारातून मोठ्या प्रमाणात रक्कम कपात करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कपातीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराकडे लेखी स्वरूपात स्पष्टीकरण मागितले होते. मात्र, त्याला कोणतेही उत्तर मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.यामुळे संतप्त झालेल्या चालक, वाहक आणि इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा घेत बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
बससेवा पूर्णपणे ठप्प
संपामुळे KDMT ची बससेवा पूर्णपणे ठप्प झाली असून डेपोतून एकही बस बाहेर पडलेली नाही. याचा फटका सकाळपासून कल्याण आणि डोंबिवलीकरांना बसला आहे. याप्रकरणी मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी कामगारांवर अन्याय करणाऱ्या कंत्राटदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. तसेच, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तातडीने न दिल्यास अधिकारी आणि कंत्राटदाराला KDMT डेपोमध्ये प्रवेश करू देणार नसल्याचा आक्रमक इशाराही त्यांनी दिला आहे.आता प्रशासन आणि कंत्राटदार यावर काय भूमिका घेतात आणि प्रवाशांची गैरसोय कधी दूर होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.