BMC Job : मुंबई महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; 473 पदांसाठी भरती होणार, महत्त्वाची अपडेट समोर
मुंबई महापालिकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाती बातमी हाती आली आहे. आता लवकरच पालिकेत वाहनचालकांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

मुंबई महापालिकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. मुंबई महापालिकेत 473 वाहनचालकांची भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या परिवहन आणि घनकचरा व्यवस्थापन खात्यातील 473 वाहनचालकांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे अनेक तरुणांना महापालिकेत काम करण्याची संधी चालून आली आहे.
मुंबई महापालिकेत वाहनचालकांची रिक्त पदे भरण्यासाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेकडून गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरू होते. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळालं आहे. वाहनचालकांची पदे रिक्त असल्याने कार्यरत चालकांवर कामाचा अतिरिक्त ताण येत होता. यामुळे त्यांना विविध आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याची तक्रार म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने महापालिकेकडे करण्यात आली होती. चालकाची समस्या सोडवण्यासाठी रिक्त पदे भरण्यात यावीत, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली होती. या संदर्भात महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अभियंता विनायक भट यांच्या दालनात बैठक पार पडली. त्यामुळे आता मुंबई महापालिकेत वाहनचालकांची पदे भरण्यात येतील, असे संकेत मिळाले आहेत.
ठाणे महापालिकेत नोकरीची संधी
मीडिया रिपोर्टनुसार, ठाणे महापालिकेतही नोकरीची सुवर्णसंधी आहे. ठाणे महापालिकेतील विविध भागातील रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यासाठी नवीन अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच अर्ज प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. या पदासाठी अर्ज पद्धत ऑनलाइन असणार आहे. 61 जागांसाठी ही भरती होणार आहे. या भरतीत तीन प्रकारची पदे असणार आहेत. स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स (पुरुष) आणि बहुउद्देशीय कर्मचारी या पदांसाठी अनुक्रमे 28, 03, 30 पदसंख्या असणार आहे.
ठाणे महापालिकेतील स्टाफ नर्स पदासाठी बी. एस्सी नर्सिंग किंवा जीएनएम कोर्स पूर्ण करणे गरजेचे आहे. तसेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिकडे नोंदणी अनिवार्य आहे. बहुउद्धेशीय कर्मचारी पदासाठी 12 वी विज्ञान उत्तीर्ण, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे. या पदांसाठी वयोमर्यादा देखील निश्चित करण्यात आली आहे. सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी वय 18 ते 38 वर्ष इतके असावे. तर आरक्षित वर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयात 3 ते 5 वर्षापर्यंत शिथिलता देण्यात आली आहे.
