12th Exam 2023 : या परीक्षा केंद्राबाहेर एकही पोलीस कर्मचारी नाही, कॉपी मुक्त अभियानाचे…

बुलढाणा जिल्ह्यात 113 केंद्रांवर 32 हजार 183 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. होणारी परीक्षा कॉपीमुक्त आणि भयमुक्त पार पडावी, यासाठी शिक्षण विभागाकडून विशेष काळजी घेण्यात आली आहे.

12th Exam 2023 : या परीक्षा केंद्राबाहेर एकही पोलीस कर्मचारी नाही, कॉपी मुक्त अभियानाचे...
buldhana exam center
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Feb 21, 2023 | 12:33 PM

गणेश सोळंकी, बुलढाणा : बारावीची परीक्षा भयमुक्तपणे पार पडावी आणि कॉपी मुक्त अभियान प्रभावीपणे राबिवलं जावं, यासाठी एका विशेष पथकाची आणि भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरामध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. मात्र बुलढाणा (buldhana) शहरातील शिवाजी विद्यालयातील परीक्षा केंद्राबाहेर (shivaji vidhyalay exam center) एकही पोलीस कर्मचारी तैनात नसून कॉपी मुक्त अभियानाचे गांभीर्य पोलीस प्रशासनाला नसल्याची चर्चा सगळीकडे सुरु झाली आहे. परीक्षा केंद्राबाहेर एकतरी पोलिस (police) कर्मचारी तैनात असतो. पण पोलिस नसल्यामुळे अनेकांना आच्छर्य वाटले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी केले कलम 144 लागू..

दहावी, बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तर परीक्षेतील गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यासोबतच आता बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी जमावबंदी आदेश लागू केला आहे. यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहेत.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे बारावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. तर दहावीची परीक्षा 2 मार्चपासून सुरू होणार आहे. हे जमावबंदी आदेश या कालावधित लागू राहतील. दरम्यान सदर परिक्षेतील गैरव्यवहार टाळण्यासाठी खबरदारीची उपाययोजना, तसेच परिक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी परीक्षा केंद्राच्या परिसरामध्ये परीक्षा कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे.

बुलढाणा जिल्ह्यात 113 केंद्रांवर 32 हजार 183 विद्यार्थी देणार परीक्षा…

बुलढाणा जिल्ह्यात 113 केंद्रांवर 32 हजार 183 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. होणारी परीक्षा कॉपीमुक्त आणि भयमुक्त पार पडावी, यासाठी शिक्षण विभागाकडून विशेष काळजी घेण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करण्यात आले असून, प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथक तैनात असणार आहे. सोबतच महसूल विभाग, पोलीस विभाग, शिक्षण विभाग यासह इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांची भरारी पथके देखील नियुक्त करण्यात आली आहेत, त्याच्या माध्यमातून कॉफी मुक्त अभियान राबवले जाणार आहे.