
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई (CJI Bhushan Gavai) यांच्यावर सुनावणीदरम्यान बूट भिरकवण्याचा प्रयत्न वकील राकेश तिवारी यांनी केला. त्यांना सुरक्षा रक्षकांनी तात्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद देशभरात उमटले. पंतप्रधानांपासून अनेक नेत्यांनी या गोष्टीचा निषेध केला. असा प्रकार याआधी घडला नव्हता. एका ज्येष्ठ वकिलाने असे कृत्य करणे हे योग्य नसल्याचा सूर उमटला. तर आता या माजी मंत्र्यांने या माथेफिरू वकिलास गोळी मारण्यात तयार असल्याचे वक्तव्य करून वाद ओढावून घेतला आहे.
सुबोध सावजींचे वादग्रस्त वक्तव्य
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका माथेफिरू वकिलाने बूट भिरकवण्याचा प्रयत्न केला होता.. देशाच्या इतिहासात इतकी गंभीर घटना घडूनही देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री बघ्याची भूमिका घेत असतील आणि त्याला कुठलीही शिक्षा होत नसेल तर मलाही वाटतं, हातात पिस्तूल घ्यावं आणि या वकिलावर गोळ्या झाडाव्या, असं धक्कादायक वक्तव्य बुलडाण्यातील माजी आमदार आणि माजी मंत्री सुबोध सावजी(Subhod Savaji) यांनी केलं आहे. त्याचवेळी वकिलावर गोळ्या झाडल्यावर माझ्यावर कोणतीही कारवाई करू नये, मला कुठलीही शिक्षा करण्यात येऊ नये अशी अजब मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्याने आता वाद उफाळला आहे.
सरन्यायाधीशांच्या टिप्पणीमुळे दुखावल्याचा दावा
वकील राकेश तिवारी यांनी सरन्यायाधीश बी.आर.गवई यांच्यावर बूट भिरकवण्याचा प्रयत्न केला. त्यांना या कृतीचा कुठलाही पश्चाताप नसल्याचे समोर आले आहे. एका दैवी शक्तीने आपल्याकडून हे कृत्यू करवून घेतल्याचा कांगावा या महाशयांनी केला. मध्य प्रदेशातील खजुराहो येथील जावरी मंदिरातील भगवान विष्णूंच्या मूर्तीच्या जिर्णोद्धार करण्याच्या मागणीच्या याचिकेदरम्यान सरन्यायाधीश गवई यांनी टिप्पणी केली होती. त्यामुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचा दावा रमेश किशोर तिवारी यांनी केला. त्यातून आपण हे कृत्य केल्याचा त्यांचा दावा आहे.
काय होते ते प्रकरण
मध्य प्रदेशातील खजुराहो हे मंदिर युनोस्कोच्या यादीतील जागतिक वारसा स्थळ आहे. या परिसरातील जवारी मंदिरात भगवान विष्णूची सात फूट उंच मूर्ती आहे. ही मूर्ती भग्न अवस्थेत आहेत. तिचे शीर नाही. या तुटलेल्या मूर्तीची पुननिर्माण करण्याची विनंती राकेश दलाल यांनी याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टाकडे केली होती. ही भंग झालेली मूर्ती बदलून तिची प्राण प्रतिष्ठा करण्याची परवानगी द्यावी अशी त्यांनी विनंती केली होती. सरन्यायाधीश बीआर गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या पीठाने राकेश दलाल यांच्या याचिकेवर विचार करण्यास नकार दिला. त्यावेळी . ‘जा आणि देवालाच काही करायला सांगा…’, अशी टिप्पणी करण्यात आली होती.