किती दिवस शिळ्या भाकरी खाणार? पृथ्वीराज चव्हाण यांच्या गौप्यस्फोटावर भाजप नेत्याचे विधान चर्चेत
Prithviraj Chavan : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 2014 ला शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्ही मिळून सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव आला होता असं विधान केले आहे. यावर आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे.

काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2014 ला शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्ही मिळून सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव आला होता असं चव्हाण यांनी म्हटलं आहे. चव्हाण यांच्या या विधानावर राज्यातील अनेक नेते प्रतिक्रिया देत आहेत. भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर बोलताना मोठं विधान केलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
किती दिवस शिळ्या भाकरी खाणार?
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आज पत्रकारांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यावर प्रश्न विचारला होता. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, ‘पृथ्वीराज चव्हाणांनी एक आत्मचरित्र लिहावे. किती दिवस शिळ्या भाकरी खाणार, त्यांनी वर्तमानावर बोलावं. माझी त्यांना विनंती आहे की भूतकाळात आता कुणी विश्वास ठेवत नाही. वर्तमान आणि भविष्य याबाबत चव्हाण यांनी काळजी घेतली पाहिजे.’
काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण?
पृथ्वीराज चव्हाण यांनी गौप्यस्फोट केला होता की, ‘शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून सरकार स्थापनेचा 2014 सालीच प्रस्ताव आलेला. पण मी तिथल्या तिथे तो प्रस्ताव रिजेक्ट केला. आमच्या पक्षाला शिवसेनेसोबत जाणं मान्य होणारच नव्हतं. पुढे 2019 साली मीच मविआचा प्रस्ताव पुढे केला होता असंही चव्हाण यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना दावा फेटाळला
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही चव्हान यांच्या विधानावर भाष्य केले आहे. पटेल यांनी, असा कुठलाही प्रस्ताव आला नव्हता अशी प्रतिक्रिया दिली असून या विषयावर अधिक बोलणे टाळले आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनीही यावर भाष्य केले आहे. पाटील यांनी म्हटले की, ‘पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रस्तावाबद्दल त्याच वेळी सांगायला हवं होते. आता त्या गोष्टींवर एवढे पाणी फिरले आहे. ते (शिवसेना आताचा ठाकरे गट) काँग्रेस सोबत गेल्यामुळेच आम्ही शिवसेनेच्या मूळ विचारांसोबत बाहेर पडलो. त्यामुळे उठाव झाला.’