महाजनांनी तो निर्णय घेतला नसता तर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता; छगन भुजबळ यांचं मोठं विधान

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भाषण करताना अनेक प्रसंग सांगितले आहेत. यात त्यांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनला असता असंही विधान केले आहे.

महाजनांनी तो निर्णय घेतला नसता तर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता; छगन भुजबळ यांचं मोठं विधान
Chhagan Bhujbal on ncp cm
Image Credit source: X
| Updated on: Jun 11, 2026 | 5:21 PM

राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे. या कार्यक्रमाला संपूर्ण राज्यातील नेते आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत. यावेळी अनेक नेत्यांनी भाषणे केली. ज्येष्ठे नेते छगन भुजबळ यांनी अनेक जुने प्रसंग सांगितले. तसेच त्यांनी आपल्या भाषणात शेरोशायरीही केली. भुजबळ नेमकं काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात.

सफर मुश्किल था, मगर हौसलो ने साथ निभाया,

हर तुफान से लढकर हमने कारवा बनाया!

ये विरासत यूही नही मिलती साथीयों,

कई लोगों ने अपना सबकुछ दाव पर लगाया!

छगन भुजबळ यांनी शेरो शायरीने भाषणाला सुरुवात केली. पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, अशा अनेक कार्यकर्ते, भगिनी 27 वर्ष या पक्षाच्या उन्नतीसाठी लढले. काँग्रेस फुटली. प्रमोद महाजन म्हणाले आपण विधानसभा भंग करू आणि निवडणुका झाल्या. सहा महिने आधीच विधानसभा स्थापन झाली होती. हे सहा महिने मिळाले असते तर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बसला असता. अजितदादाही तसे म्हणाले होते.

राष्ट्रवादी हा धर्मनिरपेक्ष पक्ष

पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेस केवळ हा पक्ष नाही. ही एक सामाजिक संस्था आहे. सर्व समाजाला घेऊन जाणारा आहे. सर्वसमावेशक आहे. धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. आज राष्ट्रवादीचा वटवृक्ष झाला आहे. अंकूराचा वटवृक्ष झाला आहे. पण आज हा वटवृक्ष झालेला असताना अजितदादा आपल्यात नाही. अनेकांनी पक्षासाठी संघर्ष केला. अजितदादांचं तर सर्वात मोठं योगदान आहे. त्यांनी तर हा पक्ष वाढवला आहे. त्यांचं काम आपल्याला पुढे न्यायचं आहे. संधी सर्वांना मिळते. त्याचं सोनं करायचं की माती करायची हे तुमच्या आमच्या हातात आहे.’

पक्षापेक्षा कुणी मोठं नाही – भुजबळ

छगन भुजबळ म्हणाले की, ‘पक्षापेक्षा कोणी मोठं नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. मगापासून चाललं हा खो खो खेळतो, कबड्डी खेळतो, बुद्धीबळ खेळतो. अरे बाबा खेळात राजकारण आणू नका आणि राजकारणाचा खेळ करू नका. पक्षापेक्षा कुणी मोठं नाही. पक्ष म्हणजे फक्त झेंडा नाही, फक्त ऑफिस किंवा त्यावर लावलेला बोर्ड नाही. पक्ष म्हणजे कार्यकर्त्यांचा मोठा समूह आहे. पक्ष आपल्याला मोठा करायचा आहे. ज्या निष्ठा आम्ही अजितदादांच्या चरणी वाहिल्या होत्या. त्याच निष्ठा सुनेत्रा ताईंच्या चरणी वाहायच्या आहेत.’

मतभेद असू शकतात, मनभेद नाही…

आपल्या भाषणात भुजबळ म्हणाले की, ‘मतभेद असू शकतात. मनभेद नाही. दुसरं लक्षात ठेवा. पदं आहेत ना, कुठलीही पदं असो. त्या अळवावरचं पाणी असतं. ती कधी निसटून जाईल हे सांगता येत नाही. कार्यकर्त्या जिवंत पाहिजे मनाने. संघर्ष आपला वारसा आहे. समर्पण आपली ओळख झाली पाहिजे’. भाषणाच्या शेवटी भुजबळांनी पुन्हा शेरोशायरी केली.

ना मंजिल से डरेंगे ना रास्तों से हारेंगे

कितने भी तुफान आए जिंदगी में

गिरकर भी संभलते रहेंगे

हम राष्ट्रवादी का झेंडा लेकर चले थे

आखिरी सांस तक लेकर चलेंगे…

 

Follow Us