Khavdya Dongar : ‘दादा राखीसाठी कोणाला कॉल करू रे.. ‘, कुणालच्या आत्याचे काळजाला भिडणारे शब्द
'दादा राखीसाठी कोणाला कॉल करू रे..', रक्षाबंधनच्या दहा दिवसांपूर्वी तीन बहिणींनी त्यांच्या भावाला गमावलं. कुणालचा आयफोनवरुन वाद इतका टोकाला पोहोचला की, त्याने मृत्यूला कवटाळलं, त्यानंतर त्याच्या आई - वडिलांनी देखील स्वतःचे प्राण संपवले. आता त्यांच्या घराची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे...

Khavdya Dongar : कुणाल चांदवडे… अभ्यासात हुशार… दहावीत 92 टक्के… इतक्या हुशार कुणाल याने फक्त 50 हजार रुपयांच्या आयफोनसाठी चक्क डोंगरावरून उडी मारल्याची घटना समोर आली आहे. आपल्या मुलाने डॉक्टर व्हावं असं, वडिलांचं स्वप्न होतं. मुलाला डॉक्टर बनवण्यासाठी वडील प्रचंड मेहनत करत होते, तर आई घर सांभाळत होती. पण एका आयफोनच्या हट्टाने कुणालचं संपूर्ण कुटुंब संपलं आहे. एकाच घरातील तिघांचा एकाच वेळी निधन झाल्यानंतर त्यांच्या घरातील स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. भावाच्या म्हणजे, कुणाल याचे वडील मुरलीधर चांदवडे यांच्या निधनानंतर बहिणींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कुणाल, वडील मुरलीधर चांदवडे, आणि आई यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, मुरलीधर चांदवडे यांच्या तीन बहिणी आहे. रक्षाबंधनच्या 10 दिवसांपू्र्वी भावाचा अशा दुर्दैवी निधन झाल्यामुळे बहिणी पूर्णपणे कोलमडल्या आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या पाच महिन्यापासून या चार भावंडांची भेट झाली नव्हती.
तीन बहिणी आणि एक भाऊ मुरलीधर चांदवडे यांनी राखीपौर्णिमेला भेटायचं ठरवलं होतं. पण जेव्हा भावाच्या निधनाची माहिती समोर आली, तेव्हा बहिणींना मोठा धक्का बसला. यावेळी मुरलीधर चांदवडे यांच्या बहिणीचा आक्रोश पाहायला मिळाला. भावाच्या मृत्यूनंतर बहीण रडत म्हणाली, ‘दादा आता मी राखी कोणाला बांधू रे… दहा दिवसांवर आलेल्या राखी पौर्णिमेला राखीसाठी कोणाला कॉल करु रे…’, असं म्हणत बहिणीने आक्रोश केला. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं.
कुणाल याच्या वडिलांबद्दल सांगायचं झालं तर, ते ट्रकचालक असल्याने त्यांना सतत बाहेर रहावं लागायचं. मध्यमवर्गीय असून सुद्धा वडिलांनी कुणाल याला आयफोन दिलेला. पण त्याला अपडेटेड आयफोन हवा होता… पण जुन्या आयफोनचेच हप्ते रखडल्याची माहिती समोर येत आहे.
आता देखील कुणाल याचे वडील तीन महिन्यांनंतर घरी आले होते. पण वडील घरी आल्यानंतर पुन्हा खटके उडू लागले, समोर येत असलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपासून घरात भांडणं सुरुच होती. अखेर भांडण विकोपास गेलं आणि संपूर्ण कुटुंबाचं होत्याचं नव्हतं झालं.