राष्ट्रवादी फुटणार असल्याच्या अफवा मुद्दाम पसरवल्या जातात, या नेत्यांनी स्पष्टच सांगितलं…
राष्ट्रवादीतील नेते फुटणार असल्याची चर्चा सुरू असल्याने त्यावर आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देताना शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली
शिर्डीः सध्या राज्यातील राजकारण विविध मुद्यांनी ढवळून निघाले आहे. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षांकडून त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. त्यातच आमदार शहाजी पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटणार असल्याच्या चर्चा सुरू केल्याने या गोष्टीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिंतन शिबिर असल्याने त्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादीतील नेते फुटणार असल्याची चर्चा सुरू असल्याने त्यावर आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, सध्या राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरामुळे पक्षाची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.
त्यामुळे सध्या पक्ष फुटणार असल्याच्या ज्या चर्चा सुरू आहेत, त्या फक्त अफवा असल्याचेही राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी सांगितले.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंतन शिबिर सुरू असून त्यामुळे पक्षाला आणि कार्यकर्त्याला बळ मिळत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते देत आहेत. तर विरोधकांकडून मात्र राष्ट्रवादी पक्ष फुटणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.
सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसल्यामुळे राष्ट्रवादी पक्ष फुटणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला. मंत्रिमंडळ विस्तार होत नाही, त्यातच विस्तार कसा करावा हा प्रश्न असल्यामुळेच भाजप आणि शिंदे गटाकडून या अफवा पसरवल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी सुषमा अंधारे यांच्या सभा घेण्यास मनाई करण्यात आल्याने राज्य सरकारवरही टीका करताना ते म्हणाले की, ही अघोषित आणीबाणीच आहे. सुषमा अंधारे यांचा सरकारला धसका असल्यानेच त्यांनी सभा घ्यायला मनाई केल्याचेही त्यांनी सांगितले.