CJP Delhi Protest : दिल्ली पोलिसांना ‘मारो मारो’ म्हणणारा तरूण तर नागपूरचा, सांगितलं आंदोलनात नेमकं काय घडलं?
तरुणांच्या या आंदोलनाचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 20 जुलै रोजीच्या आंदोलनात दिल्ली पोलिसाना 'मारो मारो' म्हणणाऱ्या तरुणाची तर देशभरात चर्चा झाली. या तरुणाने आंदोलनातून मागे न गटता दिल्ली पोलिसांनाच आव्हान दिल्याने तो नेमका कुठला आहे, असे विचारले जात होते.

CJP Delhi Protest : राजधानी दिल्लीतील सीजेपीचे आंदोलन अजूनही संपलेले नाही. या आंदोलनाने संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. शिक्षण व्यवस्थेत सुधारणेची अपेक्षा असणारा तरुण दिल्लीच्या रस्त्यावर उतरला आहे. तरुणांच्या या आंदोलनाचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 20 जुलै रोजीच्या आंदोलनात दिल्ली पोलिसांना ‘मारो मारो’ म्हणणाऱ्या तरुणाची तर देशभरात चर्चा झाली. या तरुणाने आंदोलनातून मागे न हटता दिल्ली पोलिसांनाच आव्हान दिल्याने तो नेमका कुठला आहे, असे विचारले जात होते. दरम्यान, थेट राजधानीत जाऊन संपूर्ण देशाचे लक्ष वेधणारा हा तरुण नागपुरातला असल्याचे समोर आले आहे.
मारो मारो मारो म्हणणाऱ्या तरुणाचे नाव काय?
दिल्लीमध्ये सध्या सुरू असलेल्या आंदोलनात अनेक तरुणांनी सहभाग नोंदवला आहे. यात काही तरुण तर आयआयटीयन, डॉक्टर आहेत. या तरुणांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केल्याचा आरोप केला जातोय. तसे अनेक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर फिरत आहेत. याच आंदोलनात नागपूरचा भारत बानाईत सहभागी झाला होता. आंदोलनात तो नागपूरमधून दिल्लीत गेला होता. परंतु पोलिसांनी अचानक लाठीमार केला. यावेळी त्याला पोलिसांनी घेरले आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्याला न जुमानता त्याने पोलिसांनाच ‘मारो मारो’ म्हणत होता. तसेच ‘मला मारून टाका सर’ असं म्हणत आंदोलनातून माघार घेणार नसल्याचा संदेश देत होता. त्याचीच चर्चा सगळीकडे झाली.
भारतच्या आई-वडिलांनी काय सांगितले?
भारत बानाईतचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्याच्या कुटुंबाला टीव्ही 9 मराठीने संवाद साधला. लाठीमार झाला तेव्हा मला काही माहिती नव्हते. पण मला मोबाईल समजले आणि मी माझ्या घरच्यांनाही सांगितले. भारतवरही लाठीमार झाल्याचे मी घरी सांगितले, अशी माहिती भारतच्या वडिलांनी दिली. तसेच आंदोलनात गेलेले सगळे विद्यार्थी आहेत. ते आपल्या हक्कासाठी लढत आहेत. त्यांच्यावर लाढीमार करण्याची गरज काय आहे? असा खणखणीत सवालही त्यांनी उपस्थित केला. भारतच्या आईनेही आंदोलकांना मारायला नको होते, असे मत व्यक्त केले. माझ्या मुलानेच मला लाठीमार झाल्याचे सांगितले. माझ्या मुलाच्या डोक्यावर सहा काड्या मारण्यात आल्या. त्याला दुखतच असेल की, अशा शब्दांत त्यांनी हळहळ व्यक्त केली.
भारतने नेमकं काय सांगितलं? पोलिसांनी का मारले?
भारतानेही टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. यावेळी बोलताना एका मराठी तरुणानेच माझा व्हिडीओ शूट केला. मला अगोदर काहीच माहिती नव्हतं. नंतर मला सगळ्यांचे फोन यायला लागले. मी माझ्या एका साथीदाराला विश्वासाने मोबाईल दिला होता. माझा फोन दोन तासांनी मला मिळाला. आंदोलक जिकडे होते तिकडे मी जात होतो. त्याच वेळी मला पोलिसांनी हल्ला केला. मला नागपुरातून फोन येत आहेत. हजारो मिस कॉल आले आहेत, अशी माहिती भारताने दिली. तसेच, माझ्या तब्येतीची विचारपूस केली जात आहे. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की मी चांगला आहे. क्रांतीसाठी आम्ही लढत राहू असंही त्याने ठणकावून सांगितलं. नागपूरच्या सीजेपीचे आयोजक आम्हीच आहोत.
