
Narhari Zirwal: मंत्रालयातील राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभगाच्या कार्यालयात लाचखोरीचा गंभीर प्रकार समोर आला. या खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ हे आहेत. या प्रकरणी झिरवाळ यांचे पीए रामदास गाडे आणि क्लर्क डेरिंगे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर राज्य सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहे. झिरवाळ यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. याच मागणीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी झिरवाळ यांना एका प्रकारे क्लिनचीट देऊन टाकली आहे. ते अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलते होते.
मंत्रालयात एसीबी कारवाई करते. एसीबीकडून लिपिकावर कारवाई होते. सचिवाला दुसऱ्या खात्याता पाठवलं जातं. अशा वेळी मंत्र्यांची चौकशी केली जाणार का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना एसीबी कारवाई तेव्हाच करते जेव्हा पूर्ण पुरावे तयार होतात. पूर्ण पुरावे तयार झाल्यानंतरच एसीबी आपले जाळे टाकते. संभाषण रेकॉर्ड केलं जातं. भ्रष्टाचार करताना काय काय घडलं, संभाषण काय झालं, याची नोंद होत असते. या नोंदीमध्ये ज्यांची नावे येतात, ज्यांच्याविरोधात थेट पुरावे असतात त्यांच्याविरोधात कारवाई होते, असे फडणवीस यांनी सांगितले.
तसेच, लिपिकाने पैसे मागितले. त्याला पकडलं तर त्याच्या वरच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होते. म्हणूनच सचिवांची बदली झाली. पण या सगळ्या प्रकरणात कुठल्याही पुराव्यात, कुठल्याही संभाषणात मंत्री नरहरी झिरवाळ यांचे नाव आलेले नाही. त्यांच नाव कुठेही आलं असतं तर आम्ही निश्चितपणे झिरवाळ यांनाही राजीनामा मागितला असता, असे सांगत फडणवीस यांनी झिरवाळ यांना क्लिनचीट दिली.
मंत्रालयात भ्रष्टाचार होऊदेत किंवा तहसील कार्यालयात होऊदेत. भ्रष्टाचार झाला की सरकारच्या प्रतीमेला धक्का पोहोचतोच. राज्य सरकारचा कोणताही अधिकारी लाचखोरी करतो, तेव्हा ते राज्य सरकारला भूषणावह नसतेच, असेही यावेळी फडणवीस म्हणाले. भ्रष्टाचाराविरोधात नेहमी कुठेतरी कारवाई चालूच आहे. जनसमान्यांकडून पैशांची वसुली होत असेल तर कारवाई कराच अशा सूचना आम्ही दिलेल्या असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.