… तर तात्काळ गुन्हे दाखल करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला सुरक्षेचा आढावा, दिले महत्त्वाचे आदेश

भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे महाराष्ट्रात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस व प्रशासकीय यंत्रणेचा आढावा घेतला. मॉकड्रिल, ब्लॅकआऊट तयारी, सायबर सुरक्षा आणि जनजागरणावर भर देण्यात आला आहे.

... तर तात्काळ गुन्हे दाखल करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला सुरक्षेचा आढावा, दिले महत्त्वाचे आदेश
| Updated on: May 09, 2025 | 4:14 PM

भारत पाकिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या भारतातील सर्व राज्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. सध्या जम्मू काश्मीर, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र यांसारख्या जिल्ह्यात चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात येत आहे. भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.

मॉकड्रिल, ब्लॅकआऊट इत्यादी सर्वच बाबतीत समग्र आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विविध दिशानिर्देश दिले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी, असे आदेश दिले आहे. तसेच देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले निर्देश

  • प्रत्येक जिल्ह्यात मॉकड्रिल करा आणि जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करा.
  • ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
  • ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागरण करा.
  • केंद्र सरकारच्या ‘युनियन वॉर बुक’ चे सखोल अध्ययन करीत सर्वांना त्याची माहिती द्या.
  • प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
  • प्रत्येक जिल्हाधिकारी यांना आपत्कालीन फंड आजच देणार, ज्यातून काही तातडीच्या साहित्याची खरेदी करायची असतील तर ती तत्काळ करता येईल. याव्यतिरिक्त कोणताही महत्वाचा प्रस्ताव यासंदर्भात आला तर तो 1 तासात मंजूर करा.
  • एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिकांची बैठक घ्या, त्यांनाही ‘ब्लॅकआऊट’ बाबत जागरूकता निर्माण करण्यास सांगा. यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहभागी करून घ्या.
  • पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
  • सैन्याच्या तयारी संबधित गतिविधीचे चित्रिकरण करणे आणि ते समाजमाध्यमांवर प्रसारित करणे हा गुन्हा आहे, त्यावर तत्काळ गुन्हे दाखल करा.
  • सागरी सुरक्षा वाढविण्यासाठी आवश्यकतेनुसार फिशिंग ट्रॉलर्स भाड्याने घ्या
  • नागरिकांना परिस्थितीबाबत अद्ययावत व खरी माहिती पोहोचवणे यासाठी शासनाकडून व्यवस्था उभी करा.
  • शासनाच्या अतिमहत्वाच्या पायाभूत सुविधा (उदा. विद्युतनिर्मिती, वितरण) यावर सायबर हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेता सायबर विभागाकडून त्वरित सायबर ऑडिट करून घ्या
  • सरकार आणि सुरक्षा यंत्रणा यात अधिक समन्वयासाठी मुंबईतील सैन्याचे तिन्ही दल तसेच कोस्टगार्डच्या प्रमुखांना पुढील बैठकीत व्हीसी माध्यमातून निमंत्रित करा.