
संपूर्ण राज्यात सध्या अशोक खरातच्या कारनाम्यांची चर्चा सुरू आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणी निवेदन सादर केले. अशोक खरातचे नको ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच या प्रकरणाची सविस्तर माहिती सभागृहाला दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, 17 मार्च रोजी एका महिलेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मंत्रतंत्राच्या नावाखाली कॅनडा कॉर्नर येथे या महिलेला बोलवून तिला गुंगीकारक औषध दिले. आयुष्य बरबाद करण्याची धमकी दिली. तिच्या नवऱ्यला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. सरकारवाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा त्या महिलेने तक्रार दिली आहे. त्यानंतर 17 मार्च रोजी खरातला तात्काळ अटक करण्यात आली.
पुढे बोलताना CM फडणवीस म्हणाले की, ‘गुन्हे शाखेने तपास केला. ओक्स प्रॉपर्टी या आरोपीच्या घराची झडती घेतली. सहा लाख रुपये मिळाले. दोन लॅपटॉप जप्त केले. निरगाव येथे फार्महाऊसची झडती घेतली. पिस्तूल, पाच काडतूस आणि खरेदी खताची झेरॉक्स जप्त केला आहे. मोबाईलमधील डेटा हस्तगत करण्यासाठी सायबर करण्यासाठी पाठवला आहे. आरोपी खरातचा मोबाईल फोन नाशिक पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. त्याच्या फोनमधील डेटा काढण्यासाठी सायबर विभाग नाशिकला दिला आहे. या महिला भोंदूगिरीला बळी पडल्याने पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला.’
मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की, ‘पीडीत महिला तक्रार द्यायला पुढे येत नव्हत्या. त्यांना सुरक्षेची हमी दिली आणि तक्रार देण्यास त्यांना तयार केले. व्हिडिओतील महिलांची नावे निष्पन्न करून त्या महिलांना भेटून त्या महिलांच्या नातेवाईकांना भेटून समुपदेशन केले. तीन महिलांनी तक्रार दिली. त्या महिलांचेही समुपदेशन करून तीन गुन्हे अधिकचे दाखल केले आहे. व्हिडीओत असलेल्या नसलेल्या पीडीत महिलांचा शोध सुरू असून त्यांचं समूपदेशन करून त्यांना तक्रार करण्यास सांगितलं आहे. इन्स्टा आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ डीलिट केले जात आहे. फेसबुकवरील व्हिडिओ काढले जात आहे. ज्या न्यूज चॅनलने पीडितेची ओळख होईल असं वृत्तांकन केलं आहे. त्या न्यूज चॅनलला कारवाई करण्याची नोटीस दिली आहे. न्यूज चॅनलने त्याबाबतचे वृत्तांकन बंद केलं आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.