आमची मुलं काय दहशतवादी आहेत का? अभिजीत दिपकेंच्या आईचा संताप, पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाल्या?
सोमवारी दिल्लीमध्ये आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला, दरम्यान त्यानंतर आता या आंदोलनावर अभिजीत दिपके यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कॉकोरच जनता पार्टीच्या वतीने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. सोमवारी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने थेट संसद भवनावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या संख्येनं आंदोलक सहभागी झाले होते. या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अजूनही दिल्ली येथील जंतर मंतरवर आंदोलन सुरूच आहे. यावर आता अभिजीत दिपके यांच्या आई अनिता दिपके यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय म्हणाल्या अनिता दिपके?
‘लाठीचार्ज व्हायला नव्हता पाहिजे, लेकर तिथे आंदोल करण्यासाठी गेले होते. आज एक महिना झाला तिथे त्यांचं आंदोलन सुरू आहे. तिथे कोणतीही घटना झाली नाही आणि यांनी लाठीचार्ज केला. लेकर काय दहशतवादी आहे का ते? 18 -20 वर्षांची मुलं आहेत ती. तुम्ही दहशतवाद्यांना सोडून देतात आणि तुम्ही लेकरांवर लाठीचार्ज करता, सरकारने हे योग्य केलं नाही. सरकारने आधी त्यांच्या मागण्या ऐकायच्या होत्या, काय ते बघायचं होतं, आणि नंतर काय तो निर्णय घ्यायचा होता. आमचे लेकर तिथे काय मार खायला गेले होते का? असा सवाल अभिजीत दिपके यांची आई अनिता दिपके यांनी सरकारला केला आहे.’
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,एक 14 वर्षांच्या मुलीवर यांनी लाठीचार्ज केला, मग ती काय आंतकवादी होती का? तिचे तर कपडे देखील फाडले, पोलिसांचं काम संरक्षण करण्याचं असतं मग यांनी असं का केलं? ज्या पद्धतीने हा लाठीचार्ज झाला ही घटना खूप वाईट आहे, पोलिसांनी अतिशय वाईट केलं. लाठीचार्जचे व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी आलं. त्यांनी लाठीचार्ज करायला नको होता, या आंदोलनात देशभरातून विद्यार्थी सहभागी झाले होते. दरम्यान यावेळी बोलताना अनिता दिपके या चांगल्याच भावुक झाल्या, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.
वातावरण तापलं
दरम्यान सोमवारी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांकडून संसद भवनावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आंदोलक आणि पोलीस आमने-सामने आले. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. त्यानंतर देशभरात वातावरण चांगलंच तापलं आहे. आंदोलकांना देशभरातून पाठिंबा मिळत असून, विरोधी पक्ष देखील आता या आंदोलनात उतरले आहे. आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जंतर मंतरवर जाऊन अभिजीत दिपके आणि आंदोलकांची भेट घेतली.