पुणे : पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. सध्या पुण्यात याच दोन्हीही पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दोन्ही ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार असल्याने ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. चंद्रकांत पाटील यांनीही याबाबत बैठका घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना आवाहन करणार असल्याचे म्हंटले आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात जाऊन याबाबत आढावा घेतला आहे. यावेळी ते महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती करणार असल्याचे म्हंटले आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणुकीत ट्विस्ट येईल असं विधान केलं आहे. कॉंग्रेसने कसबा पेठेत तयारी केली आहे. मात्र, अजून भाजपने तसा काही प्रस्ताव पाठविला नाही त्यामुळे तशी चर्चा करण्याचे कारण नाही असं म्हंटलंय. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत या दोन्ही ठिकाणच्या निवडणुकीत ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.