देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आदित्य ठाकरे यांच्या लग्नाची जबाबदारी, अध्यक्ष म्हणाले, आधी लग्न कोंडाण्याचे…

| Updated on: Mar 21, 2023 | 6:04 PM

बच्चू कडू यांनी हा प्रश्न बहुधा आदित्य ठाकरे यांच्याकडे बघत बघत विचारला का? अशी मिष्किली उत्तर देताना फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहून केली. सरकारने लग्न लावायचे... तर, सरकार जबाबदारी घ्यायला तयार आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आदित्य ठाकरे यांच्या लग्नाची जबाबदारी, अध्यक्ष म्हणाले, आधी लग्न कोंडाण्याचे...
ADITYA THACKERAY AND DCM DEVENDRA FADNAVIS
Image Credit source: TV9 NETWORK
Follow us on

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव आमदार आदित्य ठाकरे यांचे लग्न कधी होणार असा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे. खुद्द आदित्य ठाकरे यांना याबाबत विचारले असता त्यांनी मातोश्री रश्मी ठाकरे यांच्या दिशेने बोट दाखविले होते. अशातच विधानसभेतही आज एका लक्षवेधीच्या अनुषंगाने लग्नाचा विषय निघाला. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना एक सल्ला दिला. यामुळे सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला. त्यावर आदित्य ठाकरे यांनीही ही तुमच्यासोबत येण्यासाठी ही राजकीय धमकी तर नाही ना असा सवाल करत गुगली टाकली.

नाशिकच्या आमदार सरोज अहिरे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. राज्यातील जुने वीज निर्मिती प्रकल्प, आपत्कालीन परिस्थितीत होणारा वापर आणि त्यामुळे उद्भवणारे प्रश्न असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

हे सुद्धा वाचा

आमदार बच्चू कडू यांनी यावर उपप्रश्न विचारताना कोणताही प्रकल्प सुरु झाला की २५ ते ३० टक्के काम झाल्यानंतर तो बंद केला जातो. प्रकल्पाचे काम सुरु झाले की अनेक कामगार आपले गाव सोडून येथे येतात. पण, वर्ष दोन वर्षातच प्रकल्पाचे काम बंद पडते. त्यामुळे कामगार बेरोजगार होतात. त्या कामगारावर अवलंबून असलेले त्यांचे कुटुंब कोलमडून पडते.

राज्यात कोणत्याही प्रकल्पाची गुंतवणूक करताना तेथील कामगार आणि शेतकरी यांच्यासाठी काय करता येईल याचे धोरण आखण्यात यावे. म्हणजे लग्न कामगाराने केले आता लग्न तुटले. त्याची जबाबदारी सरकार घेणार का? असा सवाल केला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी लग्न तुटले तरी ते सरकारने लावायचे आणि पुढची जबाबदारीही सरकारनेच घ्यायची, असेच आमचे धोरण असल्याचे सांगितले.

आदित्य ठाकरे यांनी नाशिक आणि नागपूरमध्ये वीजप्रकल्पांतून निघणाऱ्या राखेच्या तलावाशी संबंधित उपप्रश्न विचारले. नाशिक आणि नागपूर जिल्ह्यात ७०० ते ८०० राखेचे तलाव आहेत. असे अनेक ठिकाणी राखेचे तलाव आहेत. त्यामुळे प्रदूषण तयार होत असून हे तलाव मोकळे करणार का? असा प्रश्न विचारला.

बच्चू कडू यांनी हा प्रश्न बहुधा आदित्य ठाकरे यांच्याकडे बघत बघत विचारला का? अशी मिष्किली उत्तर देताना फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहून केली. सरकारने लग्न लावायचे… तर, सरकार जबाबदारी घ्यायला तयार आहे.

त्यावर आदित्य ठाकरे यांनी ‘ही काही वेगळी राजकीय धमकी आहे का? की लग्न लावून देतो नाही तर आमच्यासोबत बसा’ अशी गुगली टाकली. त्यांच्या या गुगलीवर विधानसभा अध्यक्ष यांनी आधी लग्न कोंडाण्याचे… असे म्हणत आणखी हास्यबॉम्ब फोडला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही लग्न लावून द्यायची जबाबदारी घेतो… एखाद्याचे तोंड बंद करायचे असले तर हाच उत्तम आणि प्रभावी उपाय आहे. हे मी अनुभवातून सांगत आहे, असे म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.