
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीतील एका विमान अपघातात निधन झाले. या दुर्देवी घटनेनंतर संपूर्ण देशभरात विमान सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मंगळवारी सर्व नॉन-शेड्यूल ऑपरेटर्स (NSOP) आणि खासगी विमान कंपन्यांसाठी ‘झिरो टॉलरन्स’ धोरण जाहीर करत ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. आता नुकतंच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मंगळवारी सर्व खासगी आणि चार्टर विमान कंपन्यांसाठी (NSOP) नवीन आणि अत्यंत कठोर नियमावली जाहीर केली.
अजित पवारांच्या विमान अपघातानंतर आता DGCA ने एक महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती. यावेळी DGCA कडून खासगी विमान कंपन्यांसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. आता इथून पुढे व्हीआयपी संस्कृती किंवा व्यावसायिक नफा यापेक्षा प्रवाशांची सुरक्षा सर्वोच्च असेल, अशा शब्दात DGCA ने फटकारले आहे.
दरम्यान अजित पवार यांचा ज्या Learjet 45 (VT-SSK) विमानात अपघाती मृत्यू झाला, त्या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. विमानाची देखभाल आणि सुरक्षा मानकांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत DGCA ने संबंधित VSR व्हेंचर्स कंपनीची इतर चार विमाने तातडीने जमिनीवर उतरवण्याचे आदेश दिले आहेत. जोपर्यंत या विमानांची पूर्ण तांत्रिक तपासणी होत नाही, तोपर्यंत त्यांना उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली आहे. या निर्णयामुळे खासगी विमान कंपन्यांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार असून, चार्टर विमानांचा प्रवास आता अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे.