
धनंजय मुंडे यांच्या मामी सारंगी महाजन यांनी आज मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना त्या चांगल्याच भावुक झाल्या. आज मला त्यांच्याकडून बघून माझे जुने 16 वर्षांपूर्वीचे दिवस आठवले, जरी हे ग्रामीण भागात राहत असेल तरी त्यांचं आणि माझ दुःख एकच आहे. मी एकटी लढाई लढले आणि त्यांच्यासोबत त्यांचं गाव आहे हाच काय तो फरक आहे, असं यावेळी सारंगी महाजन यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या सारंगी महाजन
देशमुख कुटुंबाची भेट घेतल्यानंतर सारंगी महाजन चांगल्याच भावुक झाल्या, यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, मला याची जाणीव आहे, मी 11 वर्षे समाजासोबत काम करते. ग्रामीण भागातील गरिबाचं काय दु:ख असतं हे मला माहीत आहे. माझं दु:ख ही यापेक्षा वेगळं नाही. फरक एवढाच आहे की मी माझं दु:ख मागे टाकून मुलांना चांगलं शिक्षण दिलं. आज यांचे लहान लेकरं बघून मला खूप वाईट वाटतं. यांच्याच्यासाठी मला काही करता आलं तर मी नक्की करणार आहे, माझी जमीन आंबेजोगाईला आहे, तीची केस लढत आहे. त्या जमिनीतून मला त्यांना काही देता आलं तर मी ते त्यांना नक्की देणार आहे, असं सारंगी महाजन यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. हे दोघेही बहीण भाऊ इथे येत नाहीत, यातच समजून जा यांचे किती हात बरबाटले आहेत, असं सारंगी महाजन यांनी म्हटलं आहे. त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, माझ्या केस मध्ये गोविंद बालाजी मुंडे त्याचे ते टोळभैरव त्याच्यासोबत वाल्मिक कराड याचं कनेक्शन, वाल्मिक कराडचं कनेक्शन धनंजय मुंडेंसोबत म्हणजे धनंजय मुंडे सुद्धा यामध्ये मिक्स आहे, आणि पंकजा मुंडे या देखील यामध्ये मिक्स आहेत. हे सगळे लोक आहेत ना ते सगळे बीडचं नाव बिहार सारखं खराब करू लागले आहेत, असा आरोप महाजन यांनी केला आहे.