“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देणार”; ‘या’ मंत्र्याने शेतकऱ्यांना सरकारकडून विश्वास दिला..

| Updated on: Mar 07, 2023 | 9:33 PM

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकर करून त्यांना तात्काळ मदत मिळवून देण्याचा विचार शिंदे-फडणवीस सरकार करणार आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देणार; या मंत्र्याने शेतकऱ्यांना सरकारकडून विश्वास दिला..
Follow us on

धुळेः गेल्या दोन दिवसांपासून धुळे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. अवकाळी पावसात कांदा, गहू, मूग आणि हरभरासह भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांनी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.

त्याची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आल्याचेही गिरीश महाजन यांनी सांगितले.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामे करून नागरिकांना लवकरात लवकर मदत देण्याचे अश्वासनही गिरीश महाजन यांनी दिले आहे.

यावेळी त्यांनी सांगितले की, सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे या अधिवेशनामध्येच या विषयावर चर्चा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

महाविकास आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांना मदत वेळेत मिळत नव्हती. मात्र आता राज्यात आणि केंद्रात एकाच विचाराचे सरकार असल्यामुळे आणि या दोन्हीही सरकाराकडून लोकांना तात्काळ मदत देण्यासाठी राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस विचार करतील असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला आहे.

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे तात्काळ करून त्यांना आर्थिक मदत देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून शेतकऱ्यांबाबत सरकार संवेदनशीलपणे विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी बोलताना महाविकास आघाडीच्या सरकारवही निशाणा साधला. महाविकास आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांना मदत देताना ती योग्य वेळेतही मिळत नव्हती. त्याचबरोबर ती नुकसान झाल्यानंतरही पिकांचे पंचनामे करणे, शेतकऱ्यांना मदत मिळवून देणे याबाबत मविआ गंभीर नव्हते असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.