राजाराम बापू साखर कारखान्यावरुन ठिणगी, जयंत पाटील आणि पडळकर यांच्यात जुंपली

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यातला संघर्ष शिगेला पोचला आहे. पडळकर यांच्या वादग्रस्त विधानानंतर सुरू झालेला संघर्ष काही थांबायचं नाव घेईना अशी स्थिती आहे.

राजाराम बापू साखर कारखान्यावरुन ठिणगी, जयंत पाटील आणि पडळकर यांच्यात जुंपली
jayant patil and gopichand padalkar
| Updated on: Oct 24, 2025 | 7:48 PM

राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातला संघर्ष आता आणखी वाढणार आहे. या वादाचे केंद्रबिंदू जयंत पाटील यांचा सांगलीच्या जतमधील राजारामबापू पाटील साखर कारखाना ठरला आहे. कारण गोपीचंद पडळकर यांच्या जत विधानसभा मतदार संघात असलेल्या जयंत पाटील यांच्या कारखान्याविरोधात त्यांनी भूमिका जाहीर केली आहे. त्यानंतर काही दिवसातच साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावर रातोरात राजारामबापू ऐवजी राजे विजयसिंह डफळे असा फ्लेक्स लावला आहे. त्यामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटणार आहे.

जयंत पाटील यांच्या विरोधात सतत वादग्रस्त विधाने केल्यानंतर आता पडळकर यांनी जयंत पाटलांना कोंडीत पकडण्यासाठी जयंत पाटील यांचा साखर कारखाना टार्गेट केला आहे. राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे यंदा धुराडा पेटू देणार नाही, असा इशारा पडळकर यांनी देत मैदानात उतरण्याचे स्पष्ट केले आहे.

 राजे विजयसिंह डफळे नावाचा फ्लेक्स लावला

जयंत पाटील यांच्या राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या विरोधात गोपीचंद पडळकर नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचा लक्ष लागलेले असताना रातोरात जयंत पाटील यांच्या राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे प्रवेशद्वारावर असणारे नाव बदलण्यात आल आहे. या ठिकाणी अज्ञातांकडून राजे विजयसिंह डफळे,अशा नावाचे डिजिटल फ्लेक्स लावण्यात आले आहे.

जत येथील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना युनिट क्रमांक – ४ हा पूर्वाश्रमीचा राजे विजयसिंह सहकारी साखर कारखाना होता. दुष्काळामुळे जतचा साखर कारखाना बंद पडला.पुढे जाऊन थकीत कर्जापोटी कारखाना विक्रीला काढण्यात आला. पण या विक्रीच्या व्यवहारांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप झाला. त्यामुळे राज्य सरकारकडून प्रशासक नेमण्यात आलं.मात्र, काही काळातच कारखाना अवसायनात निघाला. मग राज्य शिखर बँकेकडून डफळे सहकारी साखर कारखाना लिलावात काढण्यात आला. त्यावेळी जयंत पाटील यांच्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याने तो ४७ कोटी ८६ लाख रुपयांमध्ये विकत घेतला.

नाव बदलण्याच्या घटनेचा निषेध –

दरम्यान, नाव बदलण्याच्या घटनेचा राजारामबापू पाटील कारखान्याच्या प्रशासनाने निषेध केला आहे. त्याचबरोबर याबाबतीत पोलिसांच्यामध्ये तक्रार केली असून कायदेशीर कारवाई केली जाईल. पण राजकीय हेतूने काही लोकांनी आरोप केल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक रामचंद्र माहुली यांनी म्हटले आहे. राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव बदलण्याच्या घटनेचा निषेध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे यांनी केला आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी हा उद्योग करण्यात आल्याचा आरोपही कोकरे यांनी केला आहे.

गोपीचंद पडळकर यांचे आरोप

जयंत पाटील यांनी सांगलीचे माजी आमदार संभाजी पवार यांचा सर्वोदय साखर कारखाना ढापला होता. सध्या तो जयंत पाटील यांच्या राजारामबापू पाटील कारखान्याकडून चालवला जात आहे. सर्वोदयप्रमाणेच जयंत पाटील यांनी जतचा कारखाना देखील ढापला आहे. पूर्वाश्रमीच्या राजे विजयसिंह डफळे सहकारी साखर कारखाना आता राजारामबापू सहकारी साखर कारखाना झाला आहे असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. २२ हजार सभासदांचा हा कारखाना असून २८० एकर जमीनीवर तो उभारला आहे. कारखान्याच्या जमीनीचे बाजारमूल्य कारखाना विक्री किंमतीपेक्षा जास्त आहे. कोट्यवधी रुपयांची किंमती असताना हा कारखान ४८ कोटींना कसा विकला गेला ? असा सवाल पडळकर यांनी केला आहे.