
Iran Israel War : इराण-इस्रायल युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी उलथापालथ होत आहे. त्याचे पडसाद आता कोल्हापूरच्या ड्रायफ्रुट्स बाजारावर उमटू लागले आहेत. कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात खजूर, पिस्ता, बदाम, अक्रोड यांसारखे ड्रायफ्रुट्स आखाती देशांतून आयात केले जातात. युद्धजन्य परिस्थितीमुळे समुद्री वाहतूक, विमा खर्च आणि आयात प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी ड्रायफ्रुट्सच्या दरात १० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. विशेषतः रमजान आणि आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर खजूर आणि पिस्त्याला मोठी मागणी असते. मात्र सध्या मालाची आवक घटल्याने किरकोळ विक्रेत्यांना वाढीव दराने माल खरेदी करावा लागत आहे. काही व्यापाऱ्यांनी साठेबाजीची शक्यता देखील नाकारलेली नाही. कोल्हापुरातील किरकोळ ग्राहकांनाही याचा फटका बसत असून, सणासुदीच्या खरेदीवर परिणाम दिसून येत आहे.
इराणवरून थेट कोल्हापुरात येणाऱ्या खजूर, पिस्ता, मामरा बदाम, शहा जीरा आणि हिंग यांचा गेल्या महिन्यातील दर आणि आजचा दर किती यात मोठा फरक निर्माण झाला आहे. खजुराचा गेल्या महिन्यातील दर 350 रुपये किलो होता. सध्याचा हा दर 450 रुपये प्रति किलोपर्यंत वाढला आहे. गेल्या महिन्यातील पिस्त्याचा दर 1800 ते 2000 रुपये प्रति किलो होता. आता हा दर 2500 ते 2650 प्रति किलोपर्यंत वाढला आहे. मामरा बदामाचा गेल्या महिन्यातील दर 3000 ते 3200 रुपये प्रति किलो होता. आता हा दर 4000 ते 4200 रुपये प्रति किलो झाला आहे. शहा जीरा गेल्या आठशे रुपये प्रति किलोने मिळायचा आता हा दर 1200 रुपये झाला आहे.
तज्ज्ञांच्या मते, जर मध्यपूर्वेतील तणाव दीर्घकाळ कायम राहिला तर दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र परिस्थिती लवकर सुरळीत झाल्यास बाजार पुन्हा स्थिर होऊ शकतो. एकूणच, आंतरराष्ट्रीय राजकीय घडामोडींचा थेट परिणाम कोल्हापूरच्या स्थानिक बाजारावर होत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.