6 खासदारांचा पक्षप्रवेश होताच एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, प्रश्न सोडवण्यासाठी घेतला मोठा निर्णय

Eknath Shinde Shivsena : आज पक्षप्रवेश होताच एकनाथ शिंदे यांनी या 6 खासदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. यामुळे संबंधित खासदारांच्या मतदारसंघात विकासकांमांना अडथळा येणार नाही.

6 खासदारांचा पक्षप्रवेश होताच एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, प्रश्न सोडवण्यासाठी घेतला मोठा निर्णय
Eknath Shinde and 6 MP
Image Credit source: X
| Updated on: Jun 22, 2026 | 5:45 PM

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 बंडखोर खासदारांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे शिवसेना आणखी मजबूत झाली आहे. अशातच आज पक्षप्रवेश होताच एकनाथ शिंदे यांनी या 6 खासदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. यामुळे संबंधित खासदारांच्या मतदारसंघात विकासकांमांना अडथळा येणार नाही. एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

आज संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील या खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, ‘सहा खासदार सोबत आले आहेत. लाखो लोकांनी मतदान केल्याने ते निवडून आले आहेत. त्या ठिकाणी आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि जनता आणि सहा लोकांची ताकद आता वाढली आहे. त्या ठिकाणी शिवसेना अधिक बळकट होईल. त्यांच्या मतदारसंघातील विकास कामं, प्रश्न आणि प्रकल्प प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम शिवसेना करेल हा एकनाथ शिंदेंचा शब्द आहे.’

सर्वांचा मानसन्मान राखला जाईल – शिंदे

पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, ‘मी दिलेला शब्द पाळतो हे माहीत आहे. त्यामुळे एक कार्यकर्ता म्हणून लोक माझ्यावर विश्वास ठेवतात. मी मुख्यमंत्री असताना कार्यकर्ता म्हणून वागलो. आताही कार्यकर्ता म्हणून वागतो. इथे कोणी मालक नाही. नेता नाही. सहकारी आहोत. सर्व कार्यकर्ता म्हणून काम करेल. त्यामुळे मी तुमच्याशी कार्यकर्त्यांसारखाच वागेल. मानसन्मान राखला जाईल. तुमच्या कार्यकर्त्यांचाही मानसन्मान राखला जाईल. कुटुंब म्हणून पुढची वाटचाल करू.

खासदारांची मंत्र्यांसोबत बैठक लावणार – शिंदे

खासदारांसाठी मोठी घोषणा करताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, ‘आपण मंत्र्यांसोबत तुमची बैठक लावू. तुमचे प्रश्न सोडवू. केंद्राशी निगडीत प्रश्नही सोडवू. कुठेही काही अडचण येणार नाही. आपल्याला सर्वांना मिळून शिवसेना अधिक मजबूत करायची आहे. वाढवायची आहे. घराघरात पोहोचवायची आहे. आपलं सर्वांचं सहकार्य आणि ताकद एकत्र आल्यावर शिवसेना अधिक भक्कम होईल.’

Follow Us