Eknath Shinde : उद्धव ठाकरेंना मोठा हादरा बसणार, पुन्हा फोडाफोडी होणार? एकनाथ शिंदेंकडून 4 नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी
उद्धव ठाकरेंना मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटात पुन्हा फोडाफोडी होण्याची शक्यता आहे. यासाठी एकनाथ शिंदेंनी 4 नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.

गिरीश गायकवाड : मुंबईच्या राजकारणात लवकरच मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या महापालिकेत पुन्हा सत्ता बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेचं महापौरपद शिंदे गटाला मिळणार असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. विशेष म्हणजे महापौरपदासाठी सव्वा-सव्वा वर्षांचा फॉर्म्युला ठरल्याचं सांगितलं जात आहे. सव्वा वर्षांच्या महापौरपदासाठी शिंदे गटाला संख्याबळ वाढवावे लागणार आहे. यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठी रणनीती आखल्याची चर्चा आहे. यासाठी शिंदेंनी चार नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेत अडीच वर्षांसाठी शिंदे गटाचा महापौर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी महायुतीने महापौरपदासाठी सव्वा-सव्वा वर्षांचा फॉर्म्युला ठरवलाय. आता अडीच वर्षांनंतर पालिकेत शिंदे गटाचा महापौर बसणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासाठी पालिका निवडणूक निकाल लागल्यानंतर महायुतीच्या समन्वय समितीने बैठकीत शिंदे गटाला भाजपने शब्द दिला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार अडीच वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढील सव्वा वर्ष शिंदे गटाचा महापौर होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यासाठी शिंदे गटाने रणनीती आखल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी शिंदे गटाचं ऑपरेशन ‘मिशन टायगर’ सक्रिय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासाठी चार नेत्यांवर मिशन टायगरची जबाबदारी देण्यात आली आहे. निलेश राणे, श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे आणि योगेश कदम ही चार नेत्यांची नावे आहेत. त्यांना याबाबत फोन करून माहिती देण्यात आली. सव्वा वर्षांनंतर महापौरपद मिळवण्यासाठी शिंदे गट संख्याबळ वाढवण्याची रणनीती आखणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.
महापौरपद पदरात पाडून घेण्यासाठी ठाकरे गटातील नगरसेवकांना गळाला लावण्याच्या हालचाली देखील सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या भाजपकडे ८८ नगरसेवक आहेत. तर शिंदे गटाकडून एकूण २९ नगरसेवक आहे. दुसरीकडे ठाकरे गटाकडे एकूण ६४ नगरसेवक आहेत. नगरसेवक फोडून महापौरपदावरील दावा मजबूत करण्यावर शिंदे गटाचा भर असणार आहे. मुंबईतील काही मतदारसंघ ठाकरे गटाचे बालेकिल्ले मानले जातात. या बालेकिल्ल्यातील नगरसेवक फुटल्यास उद्धव ठाकरेंना मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे.
