Eknath Shinde Shivsena : जयंत पाटील काय करतील ते लवकरच कळेल, शिंदे शिवसेनेच्या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य

"उपोषण 20 दिवस चालू आहे. न्यायालयाने काही सूचना दिल्या आहेत. मला वाटते यातून काहीतरी तोडगा निघाला पाहिजे. आमची भूमिका आहे की सकारात्मक मार्ग निघावा"

Eknath Shinde Shivsena : जयंत पाटील काय करतील ते लवकरच कळेल, शिंदे शिवसेनेच्या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य
Mahayuti
| Updated on: Jul 17, 2026 | 1:14 PM

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनावर बोलले आहेत. त्यांनी उपरोधिकपणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्याशिवाय वर्षा बंगल्यावर जयंत पाटील बैठकीसाठी गेलेले. त्यावर सुद्धा ते बोलले. “उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा विषय आहे, चांगला विषय आहे. त्यांचं काय ध्येय आहे, आपल्याला काही देणेघेणे नाही. हनुमान, रामाची त्यांना आठवण झाली. त्या बद्दल शुभेच्छा आहेत” असं उपरोधिकपणे शिरसाट म्हणाले. “नवनवीत राणा यांनी आरती करण्याचा प्रयत्न केला. सत्ता असताना अटक केली. जेलमध्ये ठेवले, आता यांच्यावर कारवाई केली तर? पण आम्ही कारवाई करणार नाही, भक्ती करण्यास बंधन नाही” असं संजय शिरसाट म्हणाले.

जयंत पाटील यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावर सुद्धा संजय शिरसाट बोलले. “वर्षावर बैठक झाली. पण राजकीय माहिती जोपर्यंत जयंत पाटील, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देत नाही, तोपर्यंत सत्यता काहीच नाही” असं संजय शिरसाट बोलले. “शरद पवार NDA सोबत चर्चा करत आहेत. आठ दिवसात कळेल. मी केलेलं भाकीत खरं ठरलं होतं. जयंत पाटील काय करतील ते लवकरच कळेल, जो काही निर्णय आहे, तो वरिष्ठ घेतील” असं शिरसाट म्हणाले.

सोनम वांगचूक यांचं आंदोलन थांबलं पाहिजे

सोनम वांगचूक यांच्या आंदोलनावर काही तोडगा निघाला पाहिजे असं सुद्धा ते म्हणाले. “उपोषण 20 दिवस चालू आहे. न्यायालयाने काही सूचना दिल्या आहेत. मला वाटते यातून काहीतरी तोडगा निघाला पाहिजे. आमची भूमिका आहे की सकारात्मक मार्ग निघावा, केंद्राने देखील प्रयत्न करावा आणि आंदोलन थांबवावे” असं शिरसाट म्हणाले.

मराठवाडा, विदर्भातील परिस्थिती गंभीर

संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलाबद्दल शिरसाट म्हणाले की, “कोण कुणाला भेटत आहे, याला वेग येत आहे. दिल्लीत काही बदल झाल्यास याचे परिणाम राज्यात होत आहेत. शिंदे दिल्लीत गेले की नाही याची माझ्याकडे माहिती नाही” राज्यात कमी पाऊस झाला. त्यावर सुद्धा शिरसाट यांनी वक्तव्य केलं. “मराठवाडा, विदर्भातील परिस्थिती गंभीर आहे. मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. यावर सरकार देखील उपाययोजना करत आहे”

Follow Us