Jayant Patil: जयंत पाटील राज्याचे नवीन अर्थमंत्री? शिंदेंच्या बंगल्यावर काय घडले? मोठी घडामोड काय?
Jayant Patil State Finance Minister: राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी बातमी समोर आली आहे. शरद पवार राष्ट्रवादीचे नेते जयंतराव पाटील हे राज्याचे नवीन अर्थमंत्री होण्याची मार्ग मोकळा झाल्याची माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडीला हा धक्का मानल्या जात आहे.

Jayant Patil State Finance Minister: राज्याच्या राजकारणाने मोठी कूस बदलण्याचे संकेत मिळत आहेत. शरद पवार राष्ट्रवादीचे नेते जयंतराव पाटील हे राज्याचे नवीन अर्थमंत्री असतील, असे संकेत मिळत आहेत. गेल्या दहा दिवसांपासून राज्यातील राजकारणात अंडरकरंट दिसत होते. जयंतराव पाटील आणि विनोद तावडे यांची भेट, त्यापाठोपाठ ज्येष्ठ नेते शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट, जयंतवरावांसह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या वर्षावरील भेटीगाठी आणि अखेरीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट, हा घटनाक्रमच नवीन राजकीय समीकरण स्पष्ट करत होता. एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर जयंतराव पाटील यांचा अर्थमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.
या नवीन राजकीय घडामोडीमुळे एकाच दगडात भाजपने किती विकेट काढल्या आणि किती डाव टाकले हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची ही नांदी मानली जात आहे. तर संसदेत अडकलेली महत्त्वाकांक्षी विधेयकं मार्गी लागण्यासाठीची गोळाबेरीजही पूर्ण झाल्याचे मानले जात आहे. धाकटा भाऊ अचानक महायुतीत सहभागी झाल्याने हा महाविकास आघाडीला झटका मानल्या जात आहे.
भेटीगाठीच्या सत्रांनी तापले राजकारण
गेल्या दहा दिवसात शरद पवार आणि अजितदादांची राष्ट्रवादी तसेच भाजप, शिवसेनेशी असलेली सलगी सातत्याने समोर आली. त्यातून तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. अर्थखाते सक्षमपणे सांभाळणारा नेत्याचा शोध घेण्याची गरज नव्हती. कारण चेहरा समोर होता. पण विचारांची अडचण होती. नेमकी हीच अडचण दूर करण्याचे प्रयत्न सुरू होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार, दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाला नव्याने हवा देण्यात आली. राजकारणात जर तरला महत्त्व असते. राजकीय अस्पृश्यता नसते.
मुख्यमंत्र्यांची भेट नंतर उपमुख्यमंत्र्यांशी बोलणी
जयंतराव पाटील आणि भाजप नेते विनोद तावडे हे मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटल्याचे समोर आले होते. जयंतराव पाटील यांनी त्याला दुजारोही दिला होता. त्यानंतर ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांना तडकाफडकी बाजूला केल्याचे प्रकरण घेऊन ते वर्षावर गेल्याचा त्यांचा दावा आहे. पण तिथे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोघेही नेते उपस्थित असल्याचे समोर आले आहे. अर्थात या सर्वांनी एकत्र भेट झाल्याचे वृत्त नाकारले आहे. त्यानंतर जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राष्ट्रवादीकडे अर्थखाते दिल्यास निधी देताना अन्याय होईल अशी शिंदेंची भावना होती. या भेटीनंतर जयंतराव पाटील यांना अर्थखाते देण्याचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याविषयीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
