‘जिथे जेवेल तिथेच छेद करेल’, सुनील तटकरे यांच्यावर रामदास कदम यांची जहरी टीका… म्हणाले काय?
Ramdas Kadam Criticized Sunil Tatkare: कोकणात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला आहे. रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. यामुळे राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. काय म्हणाले रामदास कदम?

Ramdas Kadam Criticized Sunil Tatkare: कोकणात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी या महायुतीतील दोन्ही घटक पक्षांमधील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता शिंदे सेनेचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. रत्नागिरीतील मंडणगड येथे ते माध्यमांशी बोलत होते. या वक्तव्याचे पडसाद कोकणात उमटण्याची शक्यता आहे. काय केली रामदास कदम यांनी टीका?
‘जिथे जेवेल तिथेच छेद करेल’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीदरम्यान प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर टीकात्मक शब्दांत निशाणा साधला. तटकरे यांच्या बाबतीत काहीही होऊ शकते, ते कुणाच्याही कायमचे होऊ शकत नाहीत, अशी टीका करत कदम म्हणाले की, “सुनील तटकरे जिथे जेवेल तिथेच छेद करेल, ही तटकरेची अवलाद आहे. त्यामुळे त्यांच्या बाबतीत न बोललेलेच बरे.” कदम यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनावर सडकून टीका
शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या ‘रामरक्षा अभियानावर’ जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा म्हणणे हा “मोठा विनोद” असल्याची टीका करत त्यांनी काँग्रेस आणि सोनिया गांधी यांच्यासोबतची युती, तसेच राहुल गांधींसोबत आदित्य ठाकरे यांच्या जवळीकीचा उल्लेख केला. हिंदुत्वाचा मुद्दा आता उपस्थित करणे हास्यास्पद असल्याचे कदम म्हणाले.
यावेळी त्यांनी, “लोक आता दूधखुळे राहिलेले नाहीत. सर्व गोष्टी जनतेला समजतात. आपण अजूनही राजकारणात आहोत, हे दाखवण्यासाठी उसनं अवसान आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, हे सर्व लोकांच्या लक्षात येत आहे,” अशी टीकाही केली. रामदास कदम यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जयंत पाटील–मुख्यमंत्री भेटीवर म्हणाले काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या भेटीवर सुरू असलेल्या राजकीय चर्चांदरम्यान शिवसेना नेते रामदास कदम यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षातील आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणे ही सामान्य बाब असून, मतदारसंघातील किंवा इतर विकासकामांसाठी कोणताही आमदार मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी रामदास कदम यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल बोलताना, ते अत्यंत चांगले, हुशार आणि सच्चे व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगितले. “जयंत पाटील माझे जवळचे मित्र आहेत. मी त्यांना जवळून ओळखतो. त्यांच्या भेटीमागे संशय घेणे किंवा त्यांच्यावर कुठलाही डाग लागेल असे बोलणे योग्य नाही,” असेही कदम यांनी ठामपणे म्हटले. या वक्तव्यानंतर जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्री भेटीवर सुरू असलेल्या राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले असून, यावर आता इतर राजकीय नेते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भास्कर जाधवांवरही टीका
शिवसेना नेते रामदास कदम यांनी आमदार भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी विरोधी पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयाला दिलेल्या भेटीवरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली. विरोधी पक्षाच्या आमदाराच्या कार्यालयाला मंत्री भेट देण्यात काहीही गैर नसल्याचे सांगत, आपण आमदार असताना तत्कालीन मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे चिपळूणहून जामगे येथील आपल्या घरी जेवणासाठी आले होते, अशी आठवण त्यांनी करून दिली. यावेळी आशिष शेलार यांनी पक्षभेद न करता लोकप्रतिनिधी म्हणून भेट दिली असून तो त्यांचा मोठेपणा असल्याचे कदम म्हणाले. तसेच प्रत्येक गोष्टीकडे संशयाने पाहणे योग्य नसल्याचा टोला त्यांनी भास्कर जाधव यांना लगावला.
यापुढे बोलताना रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर वैयक्तिक टीकाही केली. सभागृहातील त्यांची वागणूक योग्य नसल्याचे सांगत, “भास्कर जाधव यांच्या डोक्यात हवा गेली असून ते स्वतःला फार हुशार समजतात. मोठी स्वप्ने पाहत आहेत, मात्र ती साकार होत नाहीत. आता भाजपचे मंत्री त्यांच्या कार्यालयात गेले आहेत, त्यामुळे पुढे काय घडते ते पाहू,” असे वक्तव्य करत त्यांनी राजकीय टोलेबाजी केली आहे.
