लोकसभा अध्यक्षांनी असं काय सांगितलं? थेट ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात धाव; दिल्लीच्या गरम हवेत काय घडतंय?

लोकसभा अध्यक्षांची भेट शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतली. त्यांनी काही वेळ यादरम्यान चर्चा देखील केली. मात्र, या भेटीनंतर थेट ठाकरे गटाने कोर्टात धाव घेतली. ज्यानंतर आता या भेटीत नक्की काय घडले, याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

लोकसभा अध्यक्षांनी असं काय सांगितलं? थेट ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात धाव; दिल्लीच्या गरम हवेत काय घडतंय?
Sanjay Raut and Om Birla
| Updated on: Jun 17, 2026 | 1:29 PM

शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदार शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार आहेत. त्यांच्या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता देखील दिली. काल रात्रीपासून दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांनी ओम बिर्ला यांची थेट राजस्थानमध्ये भेट घेतली. ठाकरे गटात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. त्याचे हादरे केवळ महाराष्ट्रा पुरते मर्यादित राहिले नसून दिल्लीतही बसले आहेत. ठाकरेंचे सहा खासदार फुटण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे. त्यानंतर राऊत हे तडक लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीला गेले. त्यांच्या भेटीनंतर आता ठाकरे गट सुप्रीम कोर्टात धाव घेऊन दाद मागणार आहे. लोकसभा अध्यक्षांनी असं काय सांगितलं की जेणेकरून ठाकरे गटाला कोर्टात जावं लागतंय, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी नुकताच लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. लोकसभा अध्यक्षांसोबत त्यांची बैठक काही वेळ सुरू होती. लोकसभा अध्यक्षांनी त्यांनी पत्र दिल्याचीही माहिती मिळत आहे. लोकसभा अध्यक्षांच्या भेटीनंतर ठाकरे गटाने थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली. कायद्याच्या कचाट्यात या खासदारांना अडकवण्याचा प्लान ठाकरे गटाचा आहे.

यादरम्यानच लोकसभा अध्यक्षांच्या बैठकीत असे काय घडले की, ठाकरे गटाला थेट कोर्टात धाव घ्यावी लागली, यावरून तूफान चर्चा रंगत आहे. ठाकरे गट मोठ्या फुटीवर आहे. काही वेळापूर्वी संजय राऊत यांच्यासोबत ठाकरे गटाच्या नेत्यांनी प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला. त्यांनी काही गंभीर आरोप त्यांनी भाजपावर केले.

राज्यातील भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने स्पष्ट सांगितले की, भाजपाचा आणि ऑपरेशन टायगरच्या काहीच संबंध नाही. 6 खासदार थेट शिवसेना शिंदे गटाच्या गळ्याला लागत असल्याने हा मोठा धक्का शिवसेना ठाकरे गटाला आहे. याच पार्श्वभूमीवर मातोश्रीवरही महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला काही खासदार ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, संसदेतील गटनेते अरविंद सावंत आणि मुख्यप्रतोद अनिल देसाई यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बिर्ला यांच्याशी 20 मिनिटे चर्चा केली. फुटीर खासदारांच्या गटाला मान्यता देऊ नये. तसेच या खासदारांना कोणत्याही पक्षात विलिन होण्यासही मान्यता देऊ नये, अशी मागणी ठाकरे गटाने लोकसभा अध्यक्षांकडे रेटून धरल्याचं सांगितलं जातं. पण लोकसभा अध्यक्षांनी कायद्यावर बोट ठेवून या मागण्या फेटाळल्याचं समजतं. मिळालेल्या माहितीनुसार, फुटीर गटाला लोकसभा अध्यक्षांनी कालच मान्यता दिली आहे. त्यामुळेच आता ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार असून या गटाला मान्यता देऊ नये, अशी मागणी करणार असल्याचं समजतं.

दोन मुख्य मागण्या…

ठाकरे गट कोर्टात दोन मुख्य मागण्या मांडणार असल्याचं समजतं. एक म्हणजे फुटीर गटाला वेगळा गट म्हणून मान्यता देऊ नये. तसेच त्यांना कोणत्याही पक्षात विलिन होण्याची परवानगी देऊ नये. हा गट कोणत्याही पक्षात विलिन होत असेल तर त्यांची खासदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून कोर्टाला केली जाऊ शकते. यावर कोर्टानेच आज निर्णय देण्याची किंवा लोकसभा अध्यक्षांनी वेगळ्या गटाला मान्यता दिली असेल तर त्यावर स्थगिती देण्याची मागणीही ठाकरे गटाकडून केली जाऊ शकते, असं सूत्रांनी सांगितलं.

Follow Us