Sambhajiraje Bhosale | छत्रपती संभाजीराजेंची तुळजापुरातून नवी मोहीम, 9 ऑगस्टपासून सुरुवात, परिवर्तनाच्या क्रांतीची घोषणा

| Updated on: Aug 03, 2022 | 10:56 AM

येत्या 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्त महाराष्ट्रात परिवर्तनाच्या क्रांतीला सुरुवात होणार असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

Sambhajiraje Bhosale | छत्रपती संभाजीराजेंची तुळजापुरातून नवी मोहीम, 9 ऑगस्टपासून सुरुवात, परिवर्तनाच्या क्रांतीची घोषणा
छत्रपती संभाजीराजे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः कोल्हापूरचे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे (Chatrapati Sambhajiraje) यांनी काही महिन्यांपूर्वीच स्वराज्य संघटनेची (Swarajya Sanghatana) स्थापना केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याची घोषणा त्यांनी केली होती. याच मोहिमेची सुरुवात ते तुळजापूरमधून (Tuljapur, Osmanabad) करणार आहेत. छत्रपती संभाजीराजेंनी आज यासंदर्भातील एक महत्त्वाचं ट्विट केलं. येत्या 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्त महाराष्ट्रात परिवर्तनाच्या क्रांतीला सुरुवात होणार असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत उभे राहण्याची इच्छा छत्रपती संभाजीराजेंनी व्यक्त केली होती. यासाठी सर्व पक्षांचा पाठिंबा मागितला होता. मात्र शिवसेनेने छत्रपतींना पाठिंबा देण्यास नकार दिला. त्यामुळे नाराज झालेल्या छत्रपती संभाजीराजेंनी निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यानंतर त्यांनी स्वराज्य संघटनेमार्फत महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचणार असल्याची योजना जाहीर केली होती.

तुळजापुरातून सुरुवात का?

आज ( 3 ऑगस्ट ) रोजी सकाळी ट्विट करून छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात होणार, अशी घोषणा केली आहे. 9 ऑगस्ट रोजी असणाऱ्या क्रांती दिनाच्या दिवशी तुळजापूर येथे भेटू, असेही त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तुळजाभवानी मंदिरात छत्रपती संभाजीराजे यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. यामुळे मोठा वादंग निर्माण होऊन तुळजापूर शहर बंद देखील ठेवण्यात आले होते. या प्रकारामुळे जनभावना दुखावली गेली होती. यानंतर संभाजीराजे हे प्रथमच तुळजापूरला येत असून या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी क्रांती दिनी तुळजापूर येथून परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात करणार असल्याचे ट्विट केल्याने राज्यातील सामाजिक व राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागले आहे.
संभाजीराजे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून तुळजापूर येथे नेमके काय केले जाणार आहे, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

स्वराज्य संघटना वाढवणार?

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने पाठिंबा न दिल्यामुळे छत्रपती संभाजीराजे भोसले नाराज झाले होते. पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्या पाठिशी मोठा जनाधार आहे. त्यामुळे ते एखाद्या नव्या पक्षाची घोषणा करतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. किंवा अपक्ष म्हणून निवडणुकीत उभे राहतील, असेही म्हटले जात होते. मात्र त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना करण्याची घोषणा केली. या संघटनेमार्फत संपूर्ण राज्यात दौरे करणार असून जनतेच्या समस्या जाणून त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. स्वराज्य संघटनेचा विस्तार झाल्यानंतर छत्रपती संभाजीराजेंची पुढील राजकीय वाटचाल काय असेल याचीही उत्सुकता महाराष्ट्राला आहे. पुढील काही दिवसातील त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यांतून हे चित्रही स्पष्ट होईल.