शिवसेना शिंदे गटाला विधान परिषद निवडणुकीत पहिला मोठा झटका, ही जागा धोक्यात? होणार मोठा खेळ

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. बंडखोरीचा मोठा फटका शिवसेना शिंदे गटाला बसण्याची शक्यता आहे.

शिवसेना शिंदे गटाला विधान परिषद निवडणुकीत पहिला मोठा झटका, ही जागा धोक्यात? होणार मोठा खेळ
eknath shinde
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 03, 2026 | 4:12 PM

नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीत मोठा ड्रामा पहायला मिळत आहे. भाजपचे उमेदवार गणेश गीते यांच्या बंडखोरीचा मोठा फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून जागा वाटप जाहीर होण्यापूर्वीच गणेश गीते यांनी भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर महायुतीच्या बैठकीमध्ये ही जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आली. जागा वाटपानंतर शिवसेना शिंदे गटाकडून नरेंद्र दराडे यांनी आपला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे याच मतदारसंघातून गणेश गीते यांचे बंधू  गोकूळ गीते यांनी देखील आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना मी ही निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं गणेश गीते यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले गणेश गीते? 

मी निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम आहे. आज मी गिरीश महाजन यांना भेटणार आहे. त्यांनी मला भेटीसाठी बोलावलं आहे, चर्चेनंतर ठरवू काय करायचं ते. या निवडणुकीमध्ये व्हीप लागू होत नाही, त्यामुळे कोण कोणावर कारवाई करणार? हा विषय नंतरचा आहे. मला कालपासून साडेतीनशे ते चारशे नगरसेवकांचे फोन आले आहेत. या निवडणुकीसाठी टोटल मतदार 619 आहेत. त्यामुळे मी सुद्धा माझ्या निवडणूक लढण्याच्या निर्णयावर ठाम आहे. त्यामुळे आता चर्चेअंती काय निर्णय घ्यायचा ते ठरवू . उद्या उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. मला माझ्या पक्षाने एक वर्षांपूर्वीच शब्द दिला होता. या निवडणुकीत आम्ही तुम्हाला तिकीट देणार आहोत, आणि तुम्हाला ही निवडणूक लढवायची आहे, असा पक्षाचा निरोप होता, असं यावेळी गीते यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते असं देखील म्हणाले की,  याचा अर्थ असा नाही की माझ्या पक्षाने शब्द पाळला नाही, या ठिकाणी महायुती झाली आणि महायुतीमध्ये जागा वाटप करण्यात आलं. परंतु मी ही निवडणूक लढवण्याची एक वर्षापासून तयारी करत होतो, त्यामुळे मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. आमच्या बंधूपैकी एक जण अर्ज मागे घेईल. माझ्या बंधूंना पण शंका वाटत होती, की जर उद्या माझ्यावर दबाव आला तर काय? त्यामुळे त्यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला आहे. ते देखील मतदारसंघात एक वर्षांपासून मेहनत करत आहेत. शिवसेनेचे उमेदवार दराडे यांनी कोणाशीही संर्पक ठेवलेला नाही, ते कुठेही आले नाहीत आणि गेलेही नाही. त्यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे मतदारांमध्ये नाराजी आहे, त्याचा मला निश्चितपणे फायदा होईल, असा दावा गणेश गीते यांनी केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या अडचणी वाढल्या आहेत.

Follow Us