आनंदाची बातमी, भूयारी मेट्रो – ३ ‘कफ परेड’ स्थानकात पोहचली, या तारखेला संपूर्ण टप्पा सुरु
मुंबईकरांना उत्कृष्ट आणि सक्षम वाहतूक सेवा देण्याच्या उद्देशाने अखेरच्या टप्प्यातील कामे जलदगतीने पूर्ण केली जात आहेत. यशस्वी चाचण्या आमच्या प्रगतीचा स्पष्ट पुरावा आहेत. लवकरच ॲक्वा लाईनद्वारे मुंबईकरांना जागतिक दर्जाची सार्वजनिक वाहतूक सुविधा मिळणार आहे असे एमएमआरसीचे संचालक (प्रकल्प) एस. के. गुप्ता यांनी म्हटले आहे.

कुलाबा – बीकेसी ते सीप्झ या भूयारी मेट्रो – ३ चा दुसरा टप्पा लवकरच सुरु होणार आहे. आज भूयारी ‘ॲक्वा लाईन’ मेट्रोने चक्क कफ परेड या अंतिम स्थानकापर्यंतची धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. त्यामुळे लवकरच आता मेट्रो तीन या मुंबईतील भूयारी रेल्वेचा संपूर्ण सीप्झ ते कफपरेड या मार्ग पूर्ण होण्याची मार्ग मोकळा झाला आहे. ‘कनेक्ट टू अनकनेक्टेट’असे ब्रीद वाक्य असलेल्या मुंबईच्या पोटातून धावणाऱ्या पहिल्या भूयारी रेल्वेचा प्रवास करण्यास मुंबईकरांना मिळणार असून ट्रॅफीक मुक्त प्रदुषण विरहित प्रवास करता येणार आहे.
मुंबईच्या पहिल्या भुयारी मेट्रोने आज ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. ‘ॲक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो-३ च्या ट्रेनने कफ परेड या अंतिम स्थानकापर्यंतची धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. यामुळे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन ( MMRC ) साठी हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला असून मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासातील मोठी समस्या लवकरच सुटणार आहे. आचार्य अत्रे ते कफ परेड हा मेट्रोमार्ग प्रवासी वाहतुकीसाठी सुरू होण्याच्या दिशेने आता एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे.
पहिला टप्पा गेल्यावर्षी सुरु झाला
ॲक्वा लाईनच्या एकूण ३३.५ किमी लांबीच्या मार्गातील १२.६९ किमीचा पहिला टप्पा ( आरे-जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स – BKC ) ७ ऑक्टोबर २०२४ पासून प्रवाशांसाठी सुरू करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचा ९.७७ किमीचा (धारावी ते आचार्य अत्रे चौक) भाग वेगाने पूर्ण होत असून या स्थानकादरम्यान नियमित चाचण्या सुरू आहेत. हा टप्पा सात महत्त्वाच्या स्टेशनला जोडणार आहे.
आजच्या यशस्वी चाचणीमुळे १०.९९ किमी लांबीच्या टप्पा २ – बी ( आचार्य अत्रे चौक ते कफ परेड ) च्या उभारणीस गती मिळाली आहे. ओव्हरहेड कॅटेनेरी सिस्टम ( OCS ) आणि ट्रॅक बसवण्याचे काम पूर्ण झाले असून, आता उर्वरित प्रणाली म्हणजेच आर्किटेक्चरल फिनिशिंग आणि रस्ते पुनर्बांधणीची कामे प्रगतीपथावर आहे.
जुलै २०२५ पर्यंत संपूर्ण मार्ग सुरु
“धारावी ते आचार्य अत्रे चौक या टप्प्याच्या चाचण्या वेगाने सुरू असून आता आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या टप्प्यात देखील मेट्रो गाडी पोहोचली आहे. जुलै २०२५ पर्यंत संपूर्ण मार्ग कार्यान्वित करण्याचा आमचा निर्धार आहे असे एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी म्हटले आहे.
मुंबईची वाहतूक गतीमान
आजच्या यशस्वी चाचणीमुळे मेट्रो-३ च्या कामाला गती मिळणार आहे. मेट्रो – ३ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर पश्चिम उपनगर, बीकेसी आणि दक्षिण मुंबई यांना जलद आणि पर्यावरणपूरक दळणवळण सुविधा मिळणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाचा अनुभव सुखद होणार असून हा प्रकल्प त्यांच्या दैनंदिन अडचणींना सोडविण्या सज्ज झाला असून दक्षिण मुंबई ते पश्चिम मुंबई अशा २७ स्थानकांच्या परिसरातील लोकांना नवा वाहतूक मार्ग मिळणार आहे.
