Hasan Mushrif : ‘असं करून चालणार नाही’, अर्थखातं राष्ट्रवादी द्यायला शिवसेनेचा विरोध, त्यावर हसन मुश्रीफ यांची स्पष्ट भूमिका
"पेरणीसाठी शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून दिले जाईल. शेतकऱ्यांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक बोजा टाकला जाणार नाही" असं हसन मुश्रीफ म्हणाले.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अर्थ खात्यावरुन बऱ्याच चर्चा, तर्क-वितर्क सुरु आहेत. अर्थ खातं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार की सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला? त्या शिवाय अर्थ खातं राष्ट्रवादीला द्यायला एकनाथ शिंदेंचा विरोध, अशा बातम्या सुरु आहेत. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी अर्थ खातं राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळणार असं म्हटलं आहे. “अर्थ खाते निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे. आमच्या नेत्यांची बैठक झाली आहे. अर्थ खाते लवकर मिळावे, यासाठी अमित शाह आणि मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहोत” असं हसन मुश्रीफ म्हणाले. अर्थ खातं राष्ट्रवादी काँग्रेसला द्यायला शिवसेनेचा विरोध आहे, त्या प्रश्नावर हसन मुश्रीफ म्हणाले की, “महायुतीमध्ये असे करून चालणार नाही. आम्ही काही वेगळे म्हणत नाही. युतीमध्ये जे पहिल्यापासून ठरले आहे, तेच व्हावे, अशी अपेक्षा आहे”
“शरद पवार यांच्या पक्षाला एनडीएमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट सांगितले की, एनडीएमध्ये चौथा पक्ष घेतला जाणार नाही आणि आमदारांना खासदार केले जाणार नाही. दोन्ही पक्ष एकत्र यावेत, याबाबत जयंत पाटील यांनी नकार दिला आहे. त्यामुळे भविष्यात काय होईल, हे सांगता येणार नाही” असं हसन मुश्रीफ दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर म्हणाले.
भारतीय जनता पक्ष शब्दाला पक्का
पार्थ पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावरही हसन मुश्रीफ बोलले. “ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षांना अतिक्रमण प्रकरणात अपात्र करण्यात आले आहे. त्याबाबत पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली” “मला एवढीच माहिती आहे. आज नेमके काय झाले, याबद्दल मला काहीही माहिती नाही. भारतीय जनता पक्ष शब्दाला पक्का आहे. अर्थ खात्याबाबत दिलेला शब्द ते पाळतील” असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
आमचा पक्ष एकसंघ
“आमचा पक्ष एकसंघ आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकदिलाने काम करत आहोत. मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले, ही काही बातमी होऊ शकत नाही. आम्ही एकसंघ आहोत आणि एकसंघच राहणार आहोत” असं सुनील तटकरे यांच्या मुख्यमंत्री भेटीवर हसन मुश्रीफ म्हणाले.
..तर दुबार पेरणीचे संकट टळेल
“दुबार पेरणी संदर्भात आढावा बैठक घेतली आहे. 20 तारखेपर्यंत पाऊस आला, तर दुबार पेरणीचे संकट टळेल. दुबार पेरणीची वेळ आली, तर जिल्हा नियोजन निधीतून शेतकऱ्यांना मदत केली जाईल” असं हसन मुश्रीफ म्हणाले.