सोलापूरमध्ये भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना मदतीची घोषणा
सोलापूरच्या माळशीरसमध्ये भीषण अपघात घडला आहे, पिकअर रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळल्याने तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माळशीरसमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये पिकअप कोसळून हा अपघात घडला आहे. या अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. ज्या विहिरीत हा पिकअप कोसळला ती विहिरी पाण्याने काठोकाठ भरलेली होती. लोकांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने या अपघातात आठ जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. दरम्यान या घटनेत ज्यांच्या मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांसाठी सरकारकडून मदतीची घोषणा करण्यात आली आहे. या घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांच्या मदतीची घोषणा सरकारने केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
‘सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी येथे एक वाहन खाजगी शेतातील विहिरीत पडल्याने झालेल्या अपघातात काही भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. सुदैवाने 7 जणांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक दोघेही तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत आणि स्थानिक प्रशासनाशी आम्ही सातत्याने संपर्कात आहोत. या घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारकडून देण्यात येईल.’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी येथे एक वाहन खाजगी शेतातील विहिरीत पडल्याने झालेल्या अपघातात काही भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
सुदैवाने…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 14, 2026
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी येथे हे पिकअप विहिरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. हे आठही जण पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील रहिवासी होते. ते म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. गावाकडे परत येत असताना हा अपघात झाला आहे. तर सात जणांना वाचवण्यात यश आलं आहे, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.