‘बडे अच्छे लगते हैं’ ही मालिका का बंद झाली? 15 वर्षांनंतर राम कपूरचा मोठा खुलासा
'बडे अच्छे लगते हैं' या मालिकेतील राम कपूर आणि साक्षी तंवरची जोडी सुपरहिट ठरली होती. या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं होतं. तरी ही मालिका अचानक बंद करण्यात आली होती. यामागचं कारण राम कपूरने उघड केलं आहे.

‘बडे अच्छे लगते हैं’ ही टेलिव्हिजनवरील अत्यंत लोकप्रिय मालिका होती. अभिनेता राम कपूर आणि साक्षी तंवर यांनी या मालिकेत मुख्य भूमिका साकारल्या होत्या. मालिकेतील या दोघांची केमिस्ट्री तुफान हिट झाली होती. मात्र अचानक या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता ‘लॉक अप 2’ या शोमध्ये राम कपूरने मालिका बंद होण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे. शनिवारच्या एलिमिनेशन टास्कदरम्यान रामने त्याचं तिसरं आणि शेवटचं रहस्य उघड करून फिनाले वीकमधील त्याचं स्थान निश्चित केलं. या एपिसोडमध्ये त्याने कबूल केलं की, त्याच्या वागणुकीमुळेच 2011 मध्ये त्याची प्रचंड गाजलेली मालिका ‘बडे अच्छे लगते है’ बंद करण्यात आला होता.
या एपिसोडमध्ये राम कपूर म्हणाला, “मी 27 वर्षांपासून या इंडस्ट्रीत काम करतोय. मी विविध चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तरीही ‘बडे अच्छे लगते है’ या एका मालिकेमुळे मला तुफान लोकप्रियता मिळाली. ही गोष्ट मी माझ्या पत्नीलाही सांगितलं नाही की, याच मालिकेच्या शूटिंगदरम्यान मी माझ्या आयुष्यातील सर्वांत वाईट काळातून गेलो आहे. त्यावेळी माझं वजन सतत वाढत होतं. डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की सहा महिन्यांत माझा मृत्यू होऊ शकतो. मी दिवसातून तीन वेळा इन्सुलिन घेत होतो. माझ्या रक्तातील साखरेची पातळी 400 ते 600 च्या दरम्यान होती. मला माझ्या आरोग्याबद्दल काहीच करायचं नव्हतं, कारण मला खूप पैसा आणि प्रेक्षकांचं प्रेम मिळत होतं. मी हे सर्व कसं सोडू शकलो असतो? त्या काळात मी खूप वाईट व्यक्ती बनलो होतो.”
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
“मी सहा-सहा तास शूटिंगला उशिरा यायचो, सेटवर दारू प्यायचो. लोकांशी उद्धटपणे बोलायचो. मी जणू काही राक्षसच बनलो होतो. अखेर माझ्यामुळेच ती मालिका बंद झाली. मी असा माणूस बनलो होतो, ज्यामुळे मला स्वत:चीच लाज वाटत होती. जर मला मुलं नसती, तर हर्षदने ज्याप्रकारे आत्महत्येचा प्रयत्न केला, तेच मीसुद्धा केलं असतं. जेव्हा तुमच्या आयुष्यात मुलं असतात, तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी जगता आणि तुम्हाला तुमचं जीवन संपवण्याचा कोणताही अधिकार नसतो. याच गोष्टीने मला वाचवलं, याच कारणामुळे मी दहा वर्षांहून अधिक काळ जीवंत आहे”, अशा शब्दांत तो पुढे व्यक्त झाला.
