Kalyan Dombivli News : दुर्घटना, दहशत, निष्काळजीपणा आणि ड्रग्सविरोधी कारवाई; ठाणे-कल्याण-नवी मुंबईतील मोठ्या बातम्या
ठाणे परिसरात विविध गंभीर घटनांनी नागरिकांचे लक्ष वेधले आहे. भिवंडीतील कोहिनूर अपार्टमेंट दुर्घटनेचा तपास, डोंबिवलीतील घरफोडीच्या वाढत्या घटना, कल्याण पूर्वेतील नालेसफाईचा बोजवारा आणि नवी मुंबईतील अंमली पदार्थ जप्ती कारवाई या प्रमुख घडामोडी आहेत. बेकायदेशीर बांधकामे, वाढती गुन्हेगारी आणि नागरिक सुविधांमधील त्रुटी हे सध्याचे महत्त्वाचे प्रश्न आहेत.

ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई परिसरात विविध गंभीर घटनांनी नागरिकांचे लक्ष वेधले आहे. भिवंडीतील कोहिनूर अपार्टमेंट दुर्घटनेचा तपास वेगाने सुरू असून, याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. मात्र इतर दोन आरोपी अजूनही फरार आहेत. दुसरीकडे घरफोडीच्या घटनांनी डोंबिवलीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. तर कल्याण पूर्वेत नालेसफाईच्या निष्काळजीपणामुळे नागरिक हैराण झाले असून, नवी मुंबई गुन्हे शाखेने अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे.
भिवंडी दुर्घटनेप्रकरणी 1 अटकेत, दोघे फरार
भिवंडीतील भंडारी कंपाऊंड परिसरातील गंगारामवाडी येथील कोहिनूर अपार्टमेंटचा एक भाग ३० जुलैच्या रात्री नूतनीकरणाच्या कामादरम्यान कोसळून १० जणांचा मृत्यू, तर ३ जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी इमारतीत राहणारा आणि बिल्डरचा केअरटेकर म्हणून काम पाहणारा अमृतलाल निपत याला अटक केली असून त्याला 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. इमारतीचा मालक बिलाल अब्दुलकर खान आणि त्याचा साथीदार दानिश एजाज शेख हे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेनंतर शहरातील बेकायदेशीर बांधकामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता बेकायदेशीर घोषित करण्यात आलेली इमारत लोकांनी आपल्या आयुष्यभराची बचत खर्च करून खरेदी केली होती. फ्लॅट्सची नोंदणी झाली होती, मालमत्ता कर वसूल करण्यात आला होता आणि महानगरपालिकेने घरांचे क्रमांकही दिले होते. परिणामी, लोक इमारतीच्या बेकायदेशीरपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
अपघातानंतर, भिवंडी महानगरपालिकेने नुकसान झालेल्या कोहिनूर अपार्टमेंट्स इमारतीच्या पाडकामाची प्रक्रिया सुरू केली. मात्र, घटनास्थळी आलेल्या बाधित रहिवाशांनी याचा विरोध केला. त्यांनी पुनर्वसन, सुरक्षित निवारा आणि त्यांच्या सामानाची ने-आण करण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली. पर्यायी व्यवस्था न करता इमारत पाडणे योग्य नाही, असे रहिवाशांनी सांगितले. विरोधानंतर महानगरपालिकेने त्यांच्याशी चर्चा करून पुढील कारवाईचे आश्वासन दिले आहे.
डोंबिवलीत मास्कधारी चोरट्यांची दहशत !
दरम्यान, डोंबिवलीच्या सोनारपाडा परिसरात काळे कपडे, टोपी आणि मास्क घालून आलेल्या तीन ते चार चोरट्यांनी समर्थ कृपा इमारतीतील एका घराचा दरवाजा तोडून घरफोडी केली. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा दुसऱ्या दिशेला वळवण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याआधी त्यांचे चेहरे आणि हालचाली कॅमेऱ्यात कैद झाल्या. सलग घरफोडीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असून CCTV फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
टॅक्स भरूनही घाणीतून प्रवास! कल्याण पूर्वेत नालेसफाईचा बोजवारा; चिखल-गाळामुळे नागरिक हैराण
तर कल्याण पूर्वेतील सूचक नाका, चक्की नाका आणि लोकग्राम परिसरात अपूर्ण नालेसफाईमुळे रस्त्यांवर चिखल, गाळ आणि दूषित पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिसरातील शाळांमधील शेकडो विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना दररोज दुर्गंधीयुक्त चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे साथीच्या रोगांचा धोका वाढल्याची भीती व्यक्त होत असून, वेळेवर कर भरूनही मूलभूत सुविधा न मिळाल्याने नागरिकांनी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
नवी मुंबईत लाखोंचे अमली पदार्थ जप्त
याचदरम्यान, “ड्रग्समुक्त शैक्षणिक परिसर” अभियानांतर्गत नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष-1 ने ऐरोली येथे मोठी कारवाई करत 41 लाख 60 हजार रुपयांचे हॅश ऑईल आणि हायड्रो गांजा जप्त केला आहे. क्रिकेट ग्राउंड, शनी मंदिर रोड, सेक्टर-20 येथे संशयितरित्या फिरणाऱ्या रोहित प्रदीप मुठे (वय 26) याला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडून 338 ग्रॅम हॅश ऑईल आणि 78 ग्रॅम हायड्रो गांजा जप्त करण्यात आला. एफएसएल पथकाच्या उपस्थितीत पंचनामा करून आरोपीवर एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रबाळे पोलीस करत आहेत.
