
पुणे जिल्ह्याच्या जुन्नर वनविभागाच्या हद्दीत मानव-बिबट्या संघर्ष वाढत चालला असताना बिबट्यांना जेरबंद करण्याची मोहिम राबविण्यात आली होती. त्यानंतर जेरबंद केलेल्या बिबट्यांना माणिक डोह निवारण केंद्रांत ठेवण्यात आले होते. या बिबट्याचे स्थलांतर करण्यात येणार त्यानुसार आज (७ मार्च ) पहिल्या टप्प्यात २० बिबट्यांना गुजरातमधील वनतारा केंद्रात हलविण्यात आले आहे.
मानव-बिबट्याच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील काही बिबट्यांना पकडून त्यांना माणिकडोह बिबट्या निवारा केंद्र येथे ठेवण्यात आले होते. मात्र, या केंद्राची क्षमता ५० इतकी मर्यादित असल्याने अतिरिक्त बिबट्यांचे इतर योग्य ठिकाणी स्थलांतर करणे आवश्यक झाले होते. यासाठीचा प्रस्ताव Central Zoo Authority, नवी दिल्ली यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला २० डिसेंबर २०२५ रोजी मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
त्यानुसार गुजरातमधील Greens Zoological Rescue and Rehabilitation Center वनतारा येथील २५ सदस्यीय पथक पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ६ मार्च रोजी जुन्नर येथे दाखल झाले. आज पहिल्या टप्प्यात १० नर आणि १० मादी अशा २० बिबट्यांना वातानुकूलित आणि सुसज्ज रेस्क्यू व्हॅनद्वारे सुरक्षितपणे वनतारा केंद्रात रवाना करण्यात आले.
ही संपूर्ण प्रक्रिया वन्यजीव विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जुन्नर वनविभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच वाईल्डलाइफ SOS संस्थेच्या सहकार्याने पार पडली. मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
अलीकडे नगर आणि पुणे जिल्ह्यातील अनेक गावात बिबट्यांचे हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मानव आणि बिबटा संघर्ष होत आहेत. हे बिबटे ऊसाच्या शेतात त्यांचे प्रजनन करत असल्याचे देखील उघड झाले आहे. त्यामुळे बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर कसा काय अंकुश आणायचा याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात शेतात रात्रीची वीज उपलब्ध असल्याने शेताला पाणी देण्यासाठी शेतकरी रात्री शेतात जात असतात. त्यावेळी बिबट्यांनी हल्ला केल्याच्या घटनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.