विहिरीत जीव देईन पण पक्ष सोडणार नाही, श्रीकांत जिचकारांना nitin gadkari असं का म्हणाले?

| Updated on: Mar 26, 2022 | 4:19 PM

मी विद्यार्थी युनियनचा नेता होतो. श्रीकांत जिचकार माझे मित्र होते. त्यावेळी मी भाजपमध्ये काम करत होतो. लक्ष्मण मानकर हे आमचे भंडाऱ्याचे खासदार होते. त्यावेळी त्यांनी खूप प्रिंटिग मटेरियल मला दिलं होतं.

विहिरीत जीव देईन पण पक्ष सोडणार नाही, श्रीकांत जिचकारांना nitin gadkari असं का म्हणाले?
विहिरीत जीव देईन पण पक्ष सोडणार नाही, श्रीकांत जिचकारांना nitin gadkari असं का म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सांगली: मी विद्यार्थी युनियनचा नेता होतो. श्रीकांत जिचकार माझे मित्र होते. त्यावेळी मी भाजपमध्ये (bjp) काम करत होतो. लक्ष्मण मानकर हे आमचे भंडाऱ्याचे खासदार होते. त्यावेळी त्यांनी खूप प्रिंटिग मटेरियल मला दिलं होतं. एका हातात बॅग आणि खांद्यावर प्रिंटिंग मटेरीयल घेऊन मी निघालो होतो. पुण्याच्या पहिल्या नंबरच्या प्लॅटफॉर्मवर पायी आलो. मागून जिचकार आले. त्यांनी माझ्या खांद्यावरील सामान पाहिलं. ते माझे चांगले मित्रं होते. गृहराज्य मंत्री होते. त्यांनी सांगितलं, नितीन तू हे सामान कशाला घेतो यांना दे. मी म्हणालो, आमच्या पार्टीचं साहित्य आहे. ते म्हणाले, नितीन तुला एक गोष्ट सांगू. तू चांगला आहेस. पण तुझ्या पक्षाला काही भविष्य नाही. तू पार्टी बदल. मी म्हटलं, श्रीकांत मी विहिरीत जीव देईन, पण मी पार्टी बदलणार नाही. तो म्हणाला, तुझ्या पक्षाला काही भविष्य नाही. मी म्हणालो, हरकत नाही. त्यानंतर मी बाहेर आलो, असा किस्साच केंद्रीय पर्यावरण मंत्री नितीन गडकरी  (nitin gadkari) यांनी ऐकवला. निमित्त होतं सांगली (sangli) येथील पीएनजी सराफ पेढीच्या 190व्या वर्धापन दिनाचं.

अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी नितीन गडकरी यांची मुलाखत घेतली. यावेळी गडकरी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांचं वाक्य आपल्या लक्षात कसं राहिलं याचा किस्साही त्यांनी ऐकवला. त्यावेळी पुण्यातून विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसकडून व्यंकटेश माडगुळकर उभे होते. त्यावेळी स्टेशनच्या बाहेर काळी भिंत होती. त्यावर एक सुंदर वाक्य होतं. पर्याय पर्याय म्हणून ओरडतात कोण? ज्यांचे लोकसभेत निवडून आले दोन…त्यावेळी आमचे दोनच खासदार निवडून आले होते. त्यानंतर खाली लिहिलं होतं हम दो हमारे दो. ते वाचून मी हसलो. पण मला वाईट वाटलं होतं. मला श्रीकांत जिचकार यांनी एक पुस्तक दिलं होतं. रिचर्ड निक्सनचं आत्मचरित्रं होतं ते. त्यात एक वाक्य होतं. माणूस युद्धात हरल्यानंतर समाप्त होत नाही, पण तो युद्धभूमी सोडून पळून जातो तेव्हा समाप्त होतो. हे वाक्य मी आयुष्याभर लक्षात ठेवलं, असं गडकरी म्हणाले.

माझा क्लास म्हणजे…

मी इंजिनीयर नाही आणि आर्थिक सल्लागारही नाही. माझा क्लास म्हणजे सिनेमा समोरून आणि नाटक मागून पाहणाऱ्यांचा आहे. रस्त्यावरचा हाफ चहा आणि सिंगल समोसा असा आहे. मी विदर्भात खूप चूक केली. भावना आणि व्यवहार समजलो नाही. विदर्भात 22 साखर कारखान्यांनी दिवाळं पिटलं. तुमच्यासारखी स्थिती नाही. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे मेरिटच्या विद्यार्थ्यांची शाळा, मराठावाडा म्हणजे फर्स्ट क्लासच्या विद्यार्थ्यांची शाळा आणि विदर्भ म्हणजे मँडेटरी विद्यार्थ्यांची शाळा. तिथे मी तीन साखर कारखाने चालवत होतो. पण ज्यांनी मागच्या जन्मी ज्याने पाप केलं असेल तो एक तर साखर कारखाना काढतो किंवा वर्तमानपत्रं काढतो, असं त्यांनी म्हणताच एकच खसखस पिकली.

आमदाराच्या पोटातून आमदार होता कामा नये

माझ दिल्लीतील घर हे सोनिया गांधी आणि मनमोहन सिंह यांच्या मधोमध होते. त्यावेळी तेथे 7 ते 8 मोरांचा कळप येत होता. सोनिया गांधी यांच्या बंगल्यातून ते मोर माझ्याकडे येत होते. माझ्या बंगल्यातून ते मनमोहन सिंह यांच्या बंगल्यात जातात म्हणून ते राजकीय होत नाही. राजकारणात आम्ही वैचारिक विरोधक आहोत, दुश्मन नाही आहोत. मी आणि नरेंद्र मोदी एकाच विचाराचे आहोत, असं त्यांनी सांगितलं. तसेच
आमदाराच्या पोटातून आमदार होता कामा नये, खासदारांच्या पोटातून खासदार होता कामा नये. त्यामुळे माझी मुलं राजकारणात नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

संबंधित बातम्या:

मंत्र्यांना बायको आणि चहापेक्षा किटली गरम असणारा ‘पीए’च अडचणीत आणतो, nitin gadkari यांच्या चिमट्यांनी खसखस

Kirit Somaiyya कोणत्या कायद्यानुसार नोटीस देता? नोटीशीवर सही करण्यास नकार; सोमय्यांना कशेडी घाटात अडवलं

कुणी हातोडा, कुदळ, फावडा जे घ्यायचं आहे ते घ्या, मराठा मावळा दिल्लीच्या तख्तासमोर नमणार नाही, विनायक राऊत यांचं भाजपला प्रत्युत्तर