कुठं वादळी वारा, तुफान पाऊस तर कुठं उष्णतेची भयंकर लाट, IMD चा ताजा हवामान अंदाज काय?
प्राथमिक हवामान अंदाजानुसार राज्यातील मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

IMD Weather Update : सध्या राज्यात निसर्गाचा ऊन सावलीचा खेळ पाहायला मिळत आहे. राज्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसत आहेत. तर विदर्भातील काही जिल्ह्यांत मात्र उष्णतेच्या लाटेमुळे लोकांच्या जीवाची काहिली होत आहे. उन्हामुळे उष्माघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, मान्सून अगदी तोंडावर आल्याने एकीकडे शेतीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. मान्सून राज्यात कधी एकदा दाखल होतोय, याची शेतकरी, चाकरमानी वाट पाहात आहेत. दरम्यान, मान्सूबाबत तसेच उन आणि उष्णतेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
हवामानाचा नवा अंदाज काय?
हवामान विभागाच्या अगोदरच्या अंदाजानुसार देशात 26 मे रोजीपर्यंत मान्सून दाखल होणे अपेक्षित होते. परंतु या अंदाजानुसार मान्सून काही केरळमध्ये अद्याप दाखल झालेला नाही. नैरत्य मोसमी वारे अरबी समुद्रातच रेंगाळले असून आता 26 मे रोजीनंतर मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या जरी मान्सून घेऊन येणाऱ्या वाऱ्यांना पोषक वातावरण नसले तरीही पुढच्या दोन ते तीन दिवसात हे वारे वेगाने राज्याच्या दिशेने वाहण्याची शक्यता आहे.
कोणत्या जिल्ह्यांत उष्णतेची लाट?
प्राथमिक हवामान अंदाजानुसार राज्यातील मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. लातूर आणि धाराशीव जिल्ह्यातही पाऊस होऊ शकतो.
विदर्भात मात्र उष्णतेची लाट
कोकण, मराठवाड्यात सध्या वळावाचा पाऊस येण्याची शक्यता असली तरी विदर्भात मात्र कडक ऊन आहे. तेथे उष्णतेची लाट आलेली असून नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे. पुढील 24 तासात अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट येण्याची आणि तुरळ ठिकाणी रात्री उष्ण राहण्याची दाट शक्यता व्यक्त केली आहे.
मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक, पुणे या जिल्ह्यात पुढील पाच दिवसांत ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.