Israel Iran War : महाराष्ट्राच्या घराघराला थेट फटका; काय स्वस्त आणि काय महाग?

आंतरराष्ट्रीय युद्धाचा महाराष्ट्राच्या अर्थचक्रावर मोठा परिणाम झाला असून, निर्यात थांबल्याने भाजीपाला स्वस्त झाला आहे तर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.

Israel Iran War : महाराष्ट्राच्या घराघराला थेट फटका; काय स्वस्त आणि काय महाग?
Israel Iran War
| Updated on: Mar 11, 2026 | 11:03 AM

सध्या आखाती देशांमध्ये पेटलेल्या युद्धाची झळ महाराष्ट्राला लागण्यास सुरुवात झाली आहे. इराण इस्त्रालय आणि अमेरिका या देशांमध्ये पेटलेल्या युद्धाचा वणवा आता महाराष्ट्रातील शेती आणि बाजारपेठांपर्यंत पोहोचला आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराची साखळी विस्कळीत झाली आहे. याचे दोन विरुद्ध परिणाम सध्या पाहायला मिळत आहेत. एका बाजूला निर्यात ठप्प झाल्याने भाजीपाल्याचे दर कोसळले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, तर दुसरीकडे आयातीवर परिणाम झाल्याने खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

भाजीपाला स्वस्त

आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या नवी मुंबईतील वाशी (APMC) मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर प्रति किलो १० ते १५ रुपयांनी घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यात होणारा माल आता स्थानिक बाजारपेठेत येत असल्याने जास्त प्रमाणात माल जमा झाला आहे. मात्र, हॉटेल व्यवसाय आणि स्थानिक मागणीत घट झाल्याने व्यापाऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. यामुळे शिमला मिरची ६० रुपये किलोवरुन थेट ५० रुपये किलोने विकली जात आहे. तर काकडी ३० रुपयांवरून २० रुपयांवर आणि कोबी २० रुपयांवरून १२ रुपये किलोने विकली जात आहे.

शेतकरी आर्थिक संकटात

भंडारा जिल्ह्यातील गुंथरा आणि परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने काकडी, दोडके, भेंडी, कारले आणि टमाट्याची लागवड केली होती. हा माल प्रामुख्याने निर्यातीसाठी (Export) जाणार होता. ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र, इराण-इस्रायल युद्धामुळे विमान आणि समुद्री वाहतुकीवर निर्बंध आल्याने निर्यात प्रक्रिया ठप्प झाली आहे. यामुळे कवडीमोलाने माल विकावा लागत आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतही युद्धाचे सावट गडद आहे. अमेरिका-इराण तणावामुळे कांदा निर्यात पूर्णपणे बंद झाली आहे. विशेष म्हणजे आवक कमी असूनही दरात वाढ होत नसल्याने शेतकरी चक्रावून गेले आहेत. उत्पादन खर्चही निघत नाही, सरकारने आता तरी हमीभाव आणि अनुदान देऊन आम्हाला वाचवावे, अशी आर्त हाक सोलापूरच्या कांदा उत्पादकांनी दिली आहे.

खाद्यतेलाचे दर गगनाला

एकीकडे शेतीमाल स्वस्त झाला असताना, नागपुरातील खाद्यतेल बाजार मात्र तापला आहे. आखाती देशांतून होणारी आयात बाधित होण्याच्या भीतीपोटी गेल्या ८-१० दिवसांत खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. सध्या सोयाबीन तेलाचा १५ लीटरचा डब्बा २३०० रुपयांवरून २३८० रुपये इतका झाला आहे. तर शेंगदाणा तेल २५०० रुपयांवरून २६५० रुपये आणि सनफ्लॉवर तेल २३७० रुपयांवरून २४७० रुपये इतके झाले आहे.

व्यापाऱ्यांच्या मते, सध्या जुन्या स्टॉकमुळे भाव काहीसे नियंत्रणात आहेत. पण साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने कडक पावले उचलली नाहीत आणि युद्ध लांबले, तर सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us