
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल बघायला मिळतोय. मध्येच उकाडा तर मध्येच पाऊस अशी स्थिती आहे. फेब्रुवारी महिन्यात राज्यासह देशात अवकाळी पाऊस हजेरी लावताना दिसतोय. राज्यात मागील तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. नांदेड, वर्धा, परभणी, बीड आणि यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. आजही राज्यातील वातावरणात चढउतार बघायला मिळेल. हवामान विभागाने काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. धाराशिव, लातूर, बीड, नांदेड आणि यवतमाळ या भागात आज हलक्या ते मध्य स्वरूपाचा पाऊस होईल. राज्यातील काही भागात आज दिवसभर ढगाळ वातावरण राहिल. ढगाळ वातावरणामुळे उष्णता अधिक जाणवेल. उष्णता आणि पाऊस अशी स्थिती राज्यात बघायला मिळेल.
धुळे येथील राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात 12.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. अकोला येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. अकोल्यात 36.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. मात्र, सततच्या वातावरण बदलाचा थेट आरोग्यावर परिणाम होत आहे. यासोबतच मुंबईतील वायू प्रदूषण गंभीर प्रश्न बनला आहे.
राज्यात मागीत तीन दिवसात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. रब्बीचे हाती आलेले पिक गारपिटीमुळे केले. हवामान विभागाने 23 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंत अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. अशातच यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील जांब जुली पारवा येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने गहू हरभरा ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अवकाळी पावसामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप गावात रब्बी पिकांचे मोठे नुकसान. अवकाळी पावसामुळे मंद्रूप मधील शेतकऱ्याचे ज्वारी पूर्णपणे खराब झाली. हातातोंडाशी आलेली ज्वारी अवकाळी पावसामुळे हातातून गेली. खरीब हंगामानंतर आता रब्बी हंगामातील पीके हातातून गेल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पावसामुळे खराब झालेली ज्वारी आता हातात येणार नाही. त्यामुळे आता सरकारने आम्हाला तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.